खबरदार न्युज पोर्टल सांगोला मुख्य संपादक दत्तात्रय पवार मोबा 8007913668, या न्युज पोर्टल वर प्रकाशित बातमी शी संपादक सहमत असतीलच नाही. कोणताही वाद सांगोला न्यायालयाच्या कक्षेत.
अपघातमुक्त सांगोलाच्या दिशेने सांगोला पोलिसांचा जनजागृती उपक्रम
सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यात वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत सांगोला शहर व परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन न चालविणे, तसेच निष्काळजी वाहन चालविण्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणारे आकर्षक फलक उभारण्यात आले आहेत. तसेच अपघातग्रस्त दुचाकी वाहन प्रदर्शित करून अपघाताच्या भीषण परिणामांची जाणीव नागरिकांना करून देण्यात येत आहे.
"Helmet is costly, But Brain is priceless!" या प्रभावी संदेशाद्वारे दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून दिले जात असून, "अति घाई संकटात नेई" या संदेशातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या जनजागृती उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातांबाबत जागरूकता निर्माण करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.
सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करून स्वतःसह इतरांच्याही जीविताचे रक्षण करावे, असे आवाहन सांगोला पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज; नियोजनाचा आढावा :- भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत
कासेगाव, (पंढरपूर) : आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दर्जेदार, तत्पर व अखंडित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज. या अनुषंगाने कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नियोजन व आढावा बैठक पार पडली.
सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वारी मार्गावरील आरोग्य सुविधा, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, औषधसाठा, रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्कालीन उपचार सेवा, चरण सेवा, मुख्यमंत्री वारकरी सुविधा उपचार केंद्र, मुख्यमंत्री वारकरी निवारा उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्यदूत, मेडिसिन किट, उष्माघात व संसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता आणि प्रत्येक पालखी सोबत ALS रुग्ण वाहिका देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली. वारकऱ्यांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाचा महत्त्वपूर्ण सोहळा असून, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. आषाढी वारीदरम्यान कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण उद्भवू नये, यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही यावेळी सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.
याबैठकीस आरोग्य समिती सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, शोभाताई खटकाळे, सविताताई कोकाटे, संगीताताई दुधाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्री. सतीश कोपुरवाड तसेच या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
चौकट :
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज
“आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर समाजाप्रती असलेली आपली सेवा आहे. प्रत्येक वारकऱ्याला वेळेत, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने व तत्परतेने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
भाजप सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याची मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) कार्यशाळा उत्साहात संपन्न :- जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत
भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याच्या वतीने मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision - SIR) अभियानाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन टेंभुर्णी येथे करण्यात आले.
या कार्यशाळेस SIR प्रभारी, महाराष्ट्र राज्य तसेच मध्यप्रदेश राज्याचे महामंत्री व आमदार मा. श्री. भगवानदासजी सबनानी साहेब यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन अभियानाचे महत्त्व, कार्यपद्धती, अंमलबजावणी आणि प्रत्येक बूथवर अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक मा. श्री. विक्रमजी देशमुख साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी बूथ सक्षमीकरण, संघटनात्मक बांधणी आणि मतदार यादी पुनरावलोकन अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेस भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, BLA 1, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आणि अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ॲड. संदिप कागदे यांचे 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी :
मराठी पत्रकार संघ पंढरपूर यांच्या वतीने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र ता.पंढरपूर येथे 26 जून 2026 रोजी 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,
कार्यक्रमाच्या सत्रात विविध वैचारिक विषयावर चर्चा करण्यात आली.
ॲड. संदिप कागदे यांनी भारतीय राज्य घटना , मूलभूत अधिकार , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील निर्बंध , वैयक्तिक जीवनाचा अधिकार, अब्रूनुकसानीचा कायदा या सह पत्रकारितेशी संबंधित विविध कायदेशीर बाबींवर उपस्थित पत्रकारांना सविस्तर मार्गदर्शन केले. वृत्तांकन करताना पत्रकारांनी कायद्याच्या चौकटीत राहून जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली. तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच पत्रकारांची कर्तव्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयी त्यांनी मार्गदर्शन केला.
ॲड. संदिप कागदे यांचे शिक्षण बी. एस. सी., एल. एल. एम., सेट, नेट. (B.Sc.,L.L.M.,S.E.T., N.E.T) आहे. त्यांना विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल व महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्दल विश्वभूषण डॉ. बाबा साहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर च्या वतीने "विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार" देउन गौरवण्यात आले आहे. सत्र न्यायालय व मुंबई उच्चन्यायालय येथे विविध प्रकारच्या फौजदारी केसेस चालवन्याचा त्यांना अनुभव आहे, कायदा, शिक्षण, युवा सक्षमीकरण आणि पत्रकार सक्षमीकरण ह्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
चिंचणी येथे आयोजित मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप'(CONSTITUTIONAL PRESPECTIVE OF FREEDOM OF SPEECH AND EXPRESSION) आणि अब्रूनुकसानीचा कायदा (LAW OF DEFAMATION) या विषयावर ते बोलत होते.
ह्यावेळी ॲड. संदिप कागदे यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन जेष्ठ पत्रकार हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सत्कार केला.
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास संघटनेचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड यांनी केले होते.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी पत्रकार संघटनेच्या विधायक उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राचे मोहन अनपट, सचिन कुलकर्णी, प्रवीण नागणे यांनी पत्रकार संघटनेच्या विधायक उपक्रमांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद पोतदार यांनी केले.
या प्रसंगी डी राज सर्वगोड,कल्याण कुलकर्णी, रामकृष्ण बिडकर, दत्तात्रय पाटील, विनोद पोतदार, लखन साळुंखे, व्याख्याते व लेखक किरण निकम, कबीर देवकुळे, अमोल गुरव, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल माने तसेच मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र शाखा, पंढरपूरचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे पत्रकारांना पत्रकारितेतील कायदेशीर पैलूंची अधिक स्पष्ट माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
माझ्या अध्यापनाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न घडवता सुजाण नागरिक घडवण्याचे काम केले : तानाजी खंडागळे
(श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेत सेवानिवृत्ती पर सोहळा आयोजित)
वाट़बरे/प्रतिनिधी:
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेत मी जून 1992 ला रुजू झालो व 31 मे या प्रशालेतून 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. या प्रशालेचे संस्थापक कै. दा.सु.पवार सर यांनी या संस्थेत मला नोकरी दिली फक्त नोकरी दिली नाही तर माणसं दिली, नाती दिली तसेच मला खऱ्या अर्थाने घडवण्याचे काम पवार सरांनी केले .सेवानिवृत्ती पर आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले की मी अध्यापनाचे कार्य करताना इंग्रजी आणि राज्यशास्त्र या दोन विषयाचे अध्यापन केले इंग्रजीचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजीची असणारी भीती लक्षात घेता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इंग्रजी सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल व विद्यार्थ्यांना ते कसे समजेल हे मी पहिले तसेच राज्यशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकविला आज या प्रशालेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत याचा मला अभिमान वाटतो माझ्या नोकरीच्या कार्यकाळात सुखदुःखात कुटुंबातील सदस्य , माझे सहकारी व संस्था माझ्या पाठीमागे वेळोवेळी उभी राहिली त्यामुळे या सर्वांचा मी शेवटपर्यंत ऋणी राहीन .
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेत गुरुवार दि. 2 जूलै रोजी शाळेचे सहशिक्षक तानाजी खंडागळे यांच्या सेवानिवृत्ती पर सोहळा आयोजित केला होता या वेळी यशवंत हायस्कूल शिरभावी चे सहशिक्षक शहाजी घाडगे रा .हातीद हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचाही यावेळी प्रशालेच्या वतीने सत्कार घेण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या वतीने तानाजी खंडागळे व त्यांच्या कुटुंबाचा शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला तसेच शहाजी घाडगे यांचा ही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यास प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक, तसेच तानाजी खंडागळे सरांचा मित्रपरिवार ,वाटंबरे ग्रामस्थ हतीद ग्रामस्थ तसेच प्रशालेतील माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत वाटंबरे ,विकास सेवा सोसायटी वाटंबरे तसेच गावातील विविध संस्थेचे चेअरमन तसेच विविध मान्यवरांनी शिक्षकांचा शाल ,फेटा ,श्रीफळ देऊन सत्कार केला .
यावेळी शाळेचे संस्थापक मोहन पवार सर, माजी विद्यार्थी, सरांचे सहशिक्षक तसेच त्यांचे मित्रपरिवार व नातेवाईकांनी आपल्या मनोगतातुन सरांच्या विविध पैलूंची माहिती देत सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पिंटू पवार सर यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इयत्ता पाचवीची मंजुरी. :- शिक्षण व आरोग्य सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत
सोलापूर | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार उच्च प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाच्या दि. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील (GR) निकषांची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे.
शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांच्या शिफारशीनुसार मा. श्री. कुशल जैन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी वर्गवाढीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासन निर्णयातील सर्व अटी व निकषांची पडताळणी करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागत होते. वाहतुकीची अडचण, आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली, शिक्षण अर्धवट सोडत असल्याची समस्या निर्माण होत होती. आता गावातच पाचवीचा वर्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा गळती रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पालकांचा आर्थिक व मानसिक ताणही कमी होणार आहे.
या निर्णयामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला घराजवळच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणाला यामुळे बळ मिळणार आहे.या निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.
चौकट
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी २३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवी सुरू करण्यास मंजुरी मिळाली, ही आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे शाळा गळती कमी होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठे बळ मिळेल. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील.”ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे.
– मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद सोलापूर
सांगोला (वाटंबरे )येथील भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि 30 जून रोजी दुःखद निधन झाले. निधना समय त्यांचे वय 61 होते त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,चार मुली असा परिवार आहे.
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दि. 2 जुलै रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांचे नातेवाईकांनी दिली.
(मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू)
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ४२ वर्षीय असलम अब्दुल सय्यद यांचे निधन झाले. मुलाच्या अकाली जाण्याचा जबर मानसिक धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही तासांत त्यांच्या ६७ वर्षीय आईचेही निधन झाले. त्यामुळे अवघ्या १२ तासांच्या अंतरात माय-लेकरावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर ओढवली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे असलम सय्यद यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्याने मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच जन्मदात्या वृद्ध आईचेही हृदयविकाराच्या धक्क्यानेच निधन झाल्याने मानेगावात ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना रविवार, २८ जून रोजी मानेगाव ता. सांगोला येथे घडली.
असलम अब्दुल सय्यद (वय ४२) व अयुफा अब्दुल सय्यद (वय ६७) अशी मृत माय-लेकरांची नावे आहेत. मृत दोघांवर सायंकाळी स्थानिक कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सांगोला राजुरी येथील ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरात अज्ञात चोरट्यानी मंदिरामध्ये लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची विटंबना करत दीड किलोचा मुकुट, मनी मंगळसूत्र तसेच काही ऐवज लंपास केला या चोरीच्या घटनेने पूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ माजली होती.या चोरीच्या संदर्भात राजुरी ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवण्यात आले होते तसे या चोरीचा लवकर तपास न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची प्रशासनास ग्रामस्थांच्या वतीने इशारा देण्यात आला होता. आ. बाबासाहेब देशमुख यांनी काल रविवार दि. २८ जून रोजी दुपारी तीन वाजता राजुरी येथे भेट देत या चोरीच्या संदर्भातील सर्व माहिती ग्रामस्थांकडून घेतली यावेळी ग्रामस्थांकडून चोरीचा संथ गतीने चालू असलेला तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली . यावेळी त्यांनी पोलीस प्रशासना बरोबर चर्चा करून या चोरीचा तात्काळ तपास करत चोरट्यांना अटक करण्यात येईल असे आश्वासन बैठकीत ग्रामस्थांना दिले यावेळी मोठ्या प्रमाणावर राजुरी ग्रामस्थ उपस्थित होते . जे
नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न
“दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण”चा संदेश; प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचे आवाहन
सांगोला, दि. २८ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथे आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित पालक व नागरिकांना मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, “दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण!” हा केवळ संदेश नसून प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्याची हमी आहे. पोलिओ हा लसीकरणाद्वारे पूर्णपणे टाळता येणारा आजार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला प्रत्येक पल्स पोलिओ मोहिमेत दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओ मोहिमेतील दोन थेंब आवर्जून पाजावेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, ही प्रत्येक पालक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी “निरोगी बालक हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन केले.
या कार्यक्रमास सांगोला पंचायत समिती उपसभापती श्री. अजय सरगर, सांगोला पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप देवकते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओंकार कोरे, श्री. संजय शेळके, श्री. भालचंद्र भंडारे, श्री. रमेश पाटील, श्री. नामदेव आलदर, श्री. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक अधिकारी डॉ. जिलानी काझी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, परिचर, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचवूया… पोलिओमुक्त भारत घडवूया!” असा निर्धार व्यक्त केला.
चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याचे एमएचटी सीईटी परीक्षेत सुयश
* अभिषेक चौगुले याने 99.32 % गुण मिळवून चोपडी गावचे नाव केले उज्वल
सांगोला /प्रतिनिधी: चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याने महाराष्ट्र राज्याच्या एमएचटी सीईटी 2025-26 परीक्षेत सुयश 99.32 टक्के गुण मिळवून चोपडी गावचा लौकिक वाढवला आहे. अभिषेक चौगुले याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी अभिषेकच्या यशाबद्दल त्याचा सन्मान करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
अभिषेक चौगुले याला दहावीमध्ये 94.40 टक्के गुण मिळाले होते. तसेच बारावीमध्ये 80.33 गुण मिळाले आहेत. अभिषेक चौगुले हा पुढील शिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयातून computer science या शाखेतून पूर्ण करणार असल्याचे त्याचे पालक अनिल चौगुले यांनी सांगितले आहे.
अति मद्यप्राशन केलेल्या ७० वर्षीय इसमाचा वाटंबरे येथे मृत्यू
वाटंबरे/प्रतिनिधी -अति मद्य प्राशन केलेल्या ७० वर्षीय वृद्ध इसमास नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.ही घटना काल बुधवार २४ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास वाटंबरे ता. सांगोला येथील उबराव मिसाळ यांच्या व्यापारी संकुल समोर
घडली.उत्तम दामोदर नकाते ( वय -७०, रा.अकोला ता सांगोला ) असे मृताचे नाव आहे
याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा साळे यांनी खबर दिली असून , पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वाटंबरे ग्रामस्थ गेल्या ४ वर्षापासून गावात अवैध दारू विक्री बंद करावी म्हणून पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत अवैध विक्री व्यवसाय बंद होण्याऐवजी जोमाने सुरू आहे दरम्यान काल सोमवार काल सोमवार २४ जून रोजी सकाळी ८ वाजता अकोला येथील उत्तम नकाते या वृद्धाने अति मद्यप्राशन केल्याने तो जागीच बेशुद्ध होवून पडला होता या घटनेची माहिती सरपंच नामदेव पवार यांनी पोलीस स्टेशन , तहसीलदार यांना दिल्याने तहसीलदार बाळूताई भागवत, पोलीस निरीक्षक विनोद घुगे , राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी पंकज कुमार व गडदे यांनी तात्काळ वाटंबरे गावात भेट दिली असता पोलीस अधिकारी यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले यावेळी पुतण्या नितीन नकाते यांनी उत्तम नकाते यांना बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.पुढील तपास पोलीस हवालदार अनिल बनसोडे करीत आहेत.
(राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सदर घटनेची गंभीर दखल घेऊन वाटंबरे गावात अवैद्य रित्या देशी विदेशी दारू विक्रीत्यावर कारवाई करत ३२ हजार रुपयेची देशी-विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त केला.)
खंडोबा देवस्थान रस्त्यावरील धोकादायक विहिरीला संरक्षण कठडे बसवण्याची नागरिकांची मागणी
वाटंबरे, ता. सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्री जागृत खंडोबा देवस्थानाच्या पूर्व द्वाराजवळ, पिंपरी मळ्यालगत रस्त्याच्या कडेला असलेली विहीर सध्या धोकादायक अवस्थेत असून या विहिरीला तातडीने संरक्षण कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सदर विहीर चिलारीने वेढलेली असली तरी ती जीर्ण व अपुरी असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून दररोज वाहनचालक, प्रवासी, नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. याशिवाय श्री खंडोबा देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही सतत वर्दळ असते. त्यामुळे विहिरीच्या परिसरात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात विहिरीचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विहिरीभोवती मजबूत संरक्षण कठडे उभारावेत व आवश्यक सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नारायण पवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
सांगोल तालुका उदनवाडी येथील श्री. दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी या प्रशालेतील सहशिक्षक नारायण पवार यांना मुंबई येथे १४ जून रोजी बी दी चेंज फाउंडेशन यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात केला.
यावेळी नारायण पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार IAS सुमित रेवरी , डेप्युटी कमिशनर GST नंदकुमार दिघे,ACP रुक्मिणी गलांडे, अभिनेत्री निवेदिता पगार तसेच अमृत रोहोम , मयूर ढोकळे यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर ईतर मान्यवर उपस्थित होते.
नारायण पवार सर यांचे मूळ गाव वाटंबरे व ते शिक्षक म्हणून उदनवाडी या ठिकाणी कार्यरत आहेत. वाटंबरे ग्रामस्थ तसेच उदनवाडी प्रशालेतून व ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे.
वाटंबरे मान नदीपात्रातून विद्युत मोटरच्या केबलांची चोरी.
महावितरण कंपनीचा अनियमित विद्युत पुरवठ्याने बेजार झालेल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विद्युत पंपाच्या केबल चोरीमुळे मोठ्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे . बुद्धिहाळ तलावातील केबल चोरीची प्रकरण ताजे असताना वाटंबरे येथील मान नदीच्या पात्रातून पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल चोरीची घटना घडली .
या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हाता तोंडाशी आलेली पिके पाणी अभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत महावितरण कंपनीचा अनियमित वीजपुरवठा व चोरट्यांच्या केबल चोरीमुळे या भागातील शेतकरी हतलब झालेला दिसून येत आहे तरी याप्रकरणी सांगोला पोलीस स्टेशन यांनी लक्ष घालून केबल चोराना अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अपघात विरहित कामगिरीबद्दल अण्णासाहेब जगताप पुरस्काराने सन्मानित.
वाटंबरे/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील अपघात विरहित चालकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वाटंबरे तालुका सांगोला येथील सांगोला आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत असणारे अण्णासाहेब जगताप यांनी 25 वर्ष अपघात विरहित सेवा केल्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे या ठिकाणी अण्णासाहेब जगताप यांनी १९९९ साली एसटी चालक म्हणून कामास सुरुवात केली या ठिकाणी त्यांनी १६ वर्ष विना अपघात कार्य केले नंतर ते सांगोला येथे १० वर्षे एसटीमध्ये सेवा बजावत आहेत. या २६ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एसटीच्या माध्यमातून विना अपघात प्रवाशांची सुरक्षितपणे सेवा केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये विना अपघात विरहित बॅच, प्रशस्तीपत्र तसेच रोख रक्कम पंचवीस हजार व शाल श्रीफळ देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.
चौकट: यावेळी त्यांनी २६ वर्ष एसटीमध्ये सेवा बजावत असताना आलेले अनुभव कथन करताना ठाणे आगारात काम करत खंडाळा घाटातील ट्रॅफिकचे अनुभव यावेळी त्यांनी सांगितले ठाणे अक्कलकोट या बसवर चालक म्हणून त्यांना आलेले अनुभव रात्री गाडी चालवताना येणारे अनुभव तसेच आपल्या एस टी मधील प्रवाशांचा सुरक्षित प्रवास कसा होईल व तो प्रवासी गावापर्यंत कसा पोहोचला जाईल या विचाराने मी प्रेरित होऊन मी एसटीमध्ये काम करत आहे.
सोलापूर विधान परिषदेसाठी सांगोल्यातील राजश्रीताई नागणे पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा
पक्षनिष्ठा आणि केलेल्या विकास कामाच्या जोरावर राजश्रीताई नागणे पाटील यांना संधी द्यावी : कार्यकर्त्यांची मागणी
सांगोला वृत्तवेध :
महिला आरक्षण धोरण डोक्यात ठेवून सहज निवडून येणाऱ्या जागांवर महिलांना संधी देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. यामध्ये सोलापूर विधानपरिषदेसाठी एकूण 3 महिला उमेदवारांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या, सांगोल्यातील सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये सांगोला तालुक्याला संधी मिळावी अशी मागणी प्रमुख नेतेमंडळीसह भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
भाजपासाठी एकतर्फी निवडणूक असणाऱ्या सोलापूर विधान परिषदेसाठी महिला उमेदवार देण्याबाबत पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून आता यासाठी राजश्रीताई नागणे - पाटील, रश्मीताई बागल, आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर श्रद्धा जवंजाळ या तीन नेत्यांची नावे रेसमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर विधान परिषदेच्या 616 मतांपैकी साडेचारशे पेक्षा जास्त मते भाजप आणि मित्रांकडे असून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मतांची बेरीज केल्यास विरोधकांकडे मते शिल्लक राहत आहेत.अशावेळी महिला आरक्षण धोरण डोक्यात ठेवून सहज निवडून येणाऱ्या जागांवर महिलांना संधी देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून अजून कोणीही उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पक्षाने सूचना दिलेल्या नाहीत. सध्या सोलापूर विधान परिषदेसाठी जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा जवंजाळ आणि भाजप महिला आघाडीतील कोअर लीडर असणाऱ्या राजश्री नागणे ही तीन नावे पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आली आहेत.
सध्या भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, विक्रम देशमुख, शिवाजीराव सावंत आणि रणजितसिंह मोहिते पाटील, भाऊसाहेब रुपनर यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र सोलापूरच्या जागेचा निर्णय मुख्यमंत्री हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सल्ल्याने घेणार असल्याची माहिती आहे. अशावेळी पक्षाकडून सर्वात सेफ असणाऱ्या सोलापूर विधान परिषदेसाठी महिला उमेदवार देऊन महिला आस्थण धोरण भाजप राबवित असल्याचे दाखवून द्यायचे त्यामुळेच सोलापूर विधान परिषदेसाठी महिलांना संधी देण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी मोजकाच कालावधी शिल्लक असताना अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता असल्याबाबत बोलले जात आहे. तत्पूर्वी सांगोल्यातून राजश्रीताई नागणे पाटील यांना संधी मिळावी अशी माफक अपेक्षा सांगोलकरांकडून केली जात आहे. त्यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच सामाजिक कार्यातून अनेक गोरगरीब गरजूंना त्यांनी मदत केली आहे. सांगोला तालुक्यात तब्बल 30 हजार महिलांचा मेळावा घेतला, या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सांगोल्यातून राख्या पाठवून दिल्या. या निमित्ताने लाडक्या बहिणीचा सन्मान म्हणून साड्या वाटप केल्या, महिलांच्या अडी अडचणी जाणून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. तालुक्यात विविध गावात रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत, शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी बसवून देण्यात आला आहे, पाण्याच्या अडचणी सोडवले आहेत. धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने राबवले आहेत. तालुक्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेवून ती पाणी प्रश्नाचा मार्ग मोकळा केला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांना भरीव निधी दिला. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक समृद्ध करण्याबरोबर त्यांनी तयार केलेल्या प्रोडक्ट ला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला, डिजिटल शाळा करून, शाळेला पाण्याची व्यवस्था करून दिली, दुष्काळावर मात करण्यासाठी जनावरांसोबत पशुपालकांनी तब्बल 27 दिवस सांगोला तहसील समोर पाण्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनातील मागण्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार मान नदीला पाणी सोडून आंदोलन मागे घेतले. रात्री 2 वाजता देखील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांना कॅनल वर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सोडण्याचे धाडस दाखवले, शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप केले, यासह महापर्जन्य यज्ञ, टंचाई काळात चारा छावणी वर जाऊन पशुपालकांना स्नेहभोजन देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कुंकुमार्चन कार्यक्रमातून महिलांचा सन्मान, शासकीय योजना तालुक्यातील तळागाळातील महिला पर्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी दिलेले योगदान यामध्ये प्रामुख्याने संसार साहित्य वाटप करण्यामध्ये घेतलेला पुढाकार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत त्यांचा केलेला सत्कार, कोरोना काळात रुग्णांना व तालुक्यातील नागरिकांना केलेली मदत, वृद्धाश्रम व अनाथ मुलांच्या शाळेवरील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच अन्नधान्य वाटप, शेती व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा केलेला गुणगौरव, तहसील कार्यालय पोलीस स्टेशन तसेच विविध प्रशासकीय विभागातील नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, हर घर तिरंगा यावेळी शासनाच्या आदेशानुसार गावोगावी प्रसिद्धी आणि प्रचार करण्यामध्ये केलेले काम, या सह तालुक्याच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून थेट मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून सदरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केली धडपड यासह सामान्य कार्यकर्त्यांना देखील सन्मानाची वागणूक आणि त्यांचे काम मार्गे लावण्यापर्यंत केलेले प्रयत्न यामुळे सांगोला तालुक्यातून त्यांच्या नावाला पसंती दर्शवली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री नेमका कोणता निर्णय घेणार आणि कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सांगोला (प्रतिनिधी):- भरधाव वेगाने असलेल्या पुढील कारचे टायर फुटल्याने व पाठीमागून येणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून पलटी झाल्याने या अपघातात कारमधील दोघा माय लेकरांचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर कुटुंबातील अन्य 6 महिला, पुरुष व लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि.25 मे रोजी दु. 12 वाजणेच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील जुनोनी ता. सांगोला येथे घडली आहे.
संदिप भोसले वय 32 व रेखा भोसले वय 60 दोघेही रा. पलूस एमआयडीसी पलूस जि. सांगली अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर वेदांत भोसले वय 10, वैभव भोसले वय 12, दुर्वा भोसले वय 5, विद्या भोसले वय 36, ज्योती भोसले वय 30 हे गंभीर जखमी तर अनिल भोसले वय 36 हे किरकोळ जखमी झाले आहेत.
पलूस जि. सांगली येथील भोसले कुटूंबीय सध्या अधिक महिना सुरू असल्याने देवदर्शनासाठी मिरज सांगोला रोडवरून मारुती सुझुकी कारमधून पंढरपूर येथे निघाले होते, दरम्यान त्यांची कार जुनोनी ता. सांगोला जवळील बायपास जवळ आली असता त्यांच्या कार च्या पुढे असणाऱ्या कारचे टायर फुटला व दुसऱ्या लेनवरील भोसले यांच्या ताब्यातील असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने मारुती सुझुकी कार डिव्हायडरला धडकून दोन, तीन पलटी मारल्याने कारमधील संदीप भोसले व रेखा भोसले या माय लेकरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर वेदांत भोसले, वैभव भोसले, दुर्वा भोसले, विद्या भोसले, ज्योती भोसले हे गंभीर जखमी तर अनिल भोसले हे किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली आहे, याबाबत सांगोला पोलिसांत नोंद झाली नव्हती.
पोलीस पाटील ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे :पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन
वाटंबरे/ प्रतिनिधी -
पोलीस पाटलांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून, प्रत्येक गावातील माहिती वेळोवेळी पोलीस स्टेशनला सांगणे गरजेचे आहे व पोलीस पाटील हा ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे असे मत नूतन पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन यांनी नाझरे दूरक्षेत्र कार्यालयात सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. सांगोला तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित असून, मी नाझरे पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालो व पोलीस पाटलांनी माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे स्वागत व आभार मानतो असेही पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस पाटलांची आढावा बैठक घेतली.
सदर प्रसंगी पोलीस नाईक सुजित जाधव, पो.हे. कॉन्स्टेबल संजय भानवसे, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे, संतोष भडंगे, सीता देवी पाटील, पांडुरंग पवार, वनिता कोकरे, रामचंद्र चौगुले, विकास आदाटे, संध्या नलवडे, गोपाळ जाधव, मंगेश जंवजाळ, विजय वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे इ. उपस्थित होते. शेवटी पोलीस नाईक सुजित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
नाझरे येथे वळण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी.
नाझरे : येथील साठे नगर परिसरातील वळण रस्त्यावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने संबंधित ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आटपाडी सांगोला या मुख्य रस्त्यावर साठे नगर परीसर येत असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. विशेषतः दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने वळणावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यापूर्वीही काही किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवावेत तसेच इशारा फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Social Media Icons