सोमवार, ३० मार्च, २०२६
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी केले अभिवादन
रविवार, २९ मार्च, २०२६
चोपडी -रानमळा येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन.
चोपडी -रानमळा येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन.
सांगोला/ प्रतिनिधी:( दशरथ बाबर): चोपडी (रानमळा) तालुका. सांगोला येथे मंगळवार दिनांक ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भोजलिंग यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता श्री. संदीप मोहिते महाराज व अतुल हातेकर महाराज यांचा भारुडाची जुगलबंदी कार्यक्रम आयोजित केला आहे.
बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता सासनकाठीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता महिलांसाठी व पुरुषांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भव्य बक्षिसांचे आयोजन केले आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे. तर महिला व पुरुषांसाठी रस्सीखेच स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत .सकाळी ९ वाजता स्लो बाईक स्पर्धा होतील. संध्याकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता सिद्धेश्वर संगीत भजनी भारुड मंडळ दहिवडी यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता भव्य खुला रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धा लहान व मोठ्या गटात आयोजित केलेल्या आहेत. लहान गटासाठी अनुक्रमे ७ हजार रुपये ,५ हजार रुपये, ३ हजार रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत . मोठ्या गटासाठी अनुक्रमे २० हजार रुपये,१५ हजार रुपये ७ हजार रुपये, व ५ हजार रुपये असा बक्षीसांचा खजिना देण्यात येणार आहे.यात्रेच्या व कार्यक्रमाच्या संदर्भात अमोल बाबर ९४२०५६१९५५ व राहुल बाबर ९७६३०४०९५८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा . श्री भोजलिंग यात्रा कमिटी चोपडी (रानमळा) व ग्रामस्थ यांनी या यात्रेचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी भाविक- भक्त व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
शनिवार, २८ मार्च, २०२६
समर्थ संस्थेमार्फत जत येथे भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
समर्थ संस्थेमार्फत जत येथे भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
वाटंबरे: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थामार्फत'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे जत येथे 7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध लेखक,वक्ता व प्रभावी भाषण कला प्रशिक्षक मनीष काळे लाभले आहेत.
या प्रशिक्षण वर्गामध्ये भाषण कसे करावे,भाषणाची सुरुवात कशी करावी,आत्मविश्वास निर्माण करणे,भाषणासाठी विषय व मुद्दे कसे निवडावे,श्रोत्यांबद्दल माहिती,विषय,सादरीकरण ,भाषणाचे पाठांतर ,विशिष्ट भाषाशैली,भाषण रंगवणे,भारदस्त दमदार आवाज,प्रसंगावधान राखणे ,भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे,भाषणाचा शेवट कसा करावा या सर्व संवाद भाषण कला व संवाद कौशल्याचा सराव व तयारी करून घेण्यात येणार आहे.त्याचबरोबर प्रात्यक्षिक व सराव मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असून अत्यंत कमी व माफक प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्यांनी दिगंबर साळुंखे 9049106853, मनीषा साळे 7385162037 व अभिलाषा कोडग 9359881452 यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान समर्थ बहुउद्देशीय एका संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
शुक्रवार, २७ मार्च, २०२६
श्रीराम नवमी निमित्त वासुद येथे कुस्तीचा थरार; लाखोंच्या इनामांसह जंगी मैदान रंगले
श्रीराम नवमी निमित्त वासुद येथे कुस्तीचा थरार; लाखोंच्या इनामांसह जंगी मैदान रंगले
श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त वासुद येथे पारंपरिक मल्लविद्येचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या अनेक लहान-मोठ्या कुस्त्या रंगल्या. एकूण सुमारे पाच लाख रुपयांचे इनाम मल्लांना वितरित करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.
या मैदानाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या तब्बल ₹1,00,000 इनामाच्या कुस्तीत नेपाळचे पैलवान देवा थापा यांनी हिमाचल प्रदेशच्या नदीम चौहान यांच्यावर मात करत विजेतेपद पटकावले. तसेच सांगलीचे पैलवान विशाल शेळके यांनी आटपाडीच्या रणजीत आगलावे यांच्यावर विजय मिळवत प्रेक्षकांची दाद मिळवली.इतर झालेल्या कुस्त्यांमध्ये खवासपूरचे अर्जुन चव्हाण यांनी म्हसवडच्या प्रसाद फुकळे यांचा पराभव केला. खवासपूरचे करण खटके यांनी दत्ता बोडरे यांच्यावर मात केली, तर पियुष वाडेकर (खवासपूर) यांनी आटपाडीच्या भैय्या खरात यांना चितपट केले.
काही कुस्त्या अत्यंत चुरशीच्या ठरल्या. कामतीचे सुलेखान शेख व बामणीचे विनोद शिनगारे तसेच कुंभारीचे सुशांत शेजुळ व खवासपूरचे विकास निंबाळकर यांच्यातील कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या, ज्यामुळे प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केले.इतर निकालांमध्ये खवासपूरचे गणेश आवताडे यांनी आटपाडीच्या यश देवकते यांचा पराभव केला, तर मानेगावचे ज्ञानेश्वर सावंत यांनी खवासपूरच्या विकास कोळी यांच्यावर विजय मिळवला.
या भव्य मैदानाचे आयोजन वासुद येथील जुने हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते. तसेच लहान व मोठ्या कुस्त्यांचे सामने हनुमान मंदिर परिसरात दुपारी 1 वाजल्यापासूनच रंगले होते, ज्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमास वस्ताद कृष्णा शेंडगे (सर), दगडू चौगुले, बजवळकर बुवा बडरे, दादा व्हनमाने, सहदेव लेंडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी स्वतः आखाड्यात उतरून पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.
कुस्ती निवेदनाची जबाबदारी क्रीडा भूषण पुरस्कारप्राप्त पैलवान कृष्णा शेंडगे (सर) यांनी प्रभावीपणे पार पाडली. यावेळी सागर पाटील, यशराजे साळुंखे पाटील, अतुल पवार, योगेश खटकाळे, गुंडा दादा खटकाळे ,मोहन बापू आलदार, डॉ.शिवराज भोसले, डॉ.विजय बंडगर,डॉ.महेश राऊत,डॉ.महादेव जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्रीराम मंडळाचे सदस्य:
भीमराव सावंत, प्रकाश केदार, वसंतराव शिंदे, शहाजी पाटील, विठ्ठल नाना केदार, सुभाष शिंदे, पोपट भोरे, अरविंद केदार, राहुल भोरे, सुनील भोरे, दत्ता केदार, प्रकाश भोरे, सुनील केदार, अशोक गोरे, अशोक शास्त्री, गोपाळ मराळ, राहुल केदार, गोपी केदार, डॉ. निरंजन केदार, अंकुश सावंत, मधुकर पवार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
एकंदरीत, वासुद येथील या भव्य कुस्ती मैदानाने श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करत पारंपरिक मल्लविद्येला नवे बळ दिले. गावकऱ्यांनी व परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शुक्रवार, २० मार्च, २०२६
ऑनलाइन सेवा ही काळाची गरज : डॉ.रवींद्र आरळी
ऑनलाइन सेवा ही काळाची गरज : डॉ.रवींद्र आरळी
(समर्थ संस्थेच्या श्रेयस ऑनलाईन सेंटरचे उद्घाटन संपन्न)
जत: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेच्या समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र अंतर्गत श्रेयश कॉम्प्युटर व ऑनलाइन सर्विस सेंटर चे जत येथे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी व नगरसेविका संगीता सोनुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी यांनी शुभेच्छा देताना सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांकडे वेळ कमी असल्याने ऑनलाइन सेवा ही एक काळाची गरज बनली आहे. संस्थेने लोकांना कमी वेळेत व माफक दरात चांगल्या सुविधा देऊन आपला नावलौकिक वाढवावा. यावेळी नगरसेविका संगीता सोनुले मॅडम यांनी शुभेच्छा देताना समर्थ संस्थेने जत मधील महिलांना व्यवसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यास मदत करावी त्यासाठी आम्ही लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. केंद्र संचालिका मनीषा साळे यांनी प्रस्ताविकामध्ये संस्थेमध्ये ऑनलाइन सुविधा बरोबर विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी अनेक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. केंद्र संचालिका अभिलाषा कोडग यांनी महिलांसाठी गृह उद्योगांचे प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख राजश्री उबाळे व आभार मयुरी सावंत यांनी मांडले. या कार्यक्रमास परशुराम ऐवळे, गोपाल पाथरूट,अविनाश सोनुले, वैभव जगधने,कविता मराठे,स्वाती बडचीकर, शारदा कांबळे,सुशील चव्हाण सर, कल्पना कणसे, विजय सावंत, परिक्षित चव्हाण,प्रताप चव्हाण,ज्योतीराम सावंत,पुनम सावंत,नयना सोनवने,भास्कर सोनवणेसर,प्रकाश कदम यांच्यासह जत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाटंबरे येथे रविवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन
वाटंबरे येथे रविवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन
वाटंबरे (ता. सांगोला) : गावातील सामाजिक व धार्मिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने येत्या रविवारी वाटंबरे येथे सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान खंडोबा मंदिरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ह. भ. प .मा. प्राध्यापक रामेश्वर महाराज जाधव , प्रमुख वक्ते योगेश शामराव कुलकर्णी, मातृशक्ती श्रीमती अर्पणाताई माणिक साळुंखे या मान्यवरांचे मार्गदर्शन, धार्मिक प्रवचने तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास वाटंबरे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संमेलनात हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून युवकांनाही विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू असून, कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावात प्रथमच हिंदू संमेलनाचे आयोजन असल्यामुळे या संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी : चेतन सिंह केदार सावंत.
नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी : चेतन सिंह केदार सावंत.
भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांची पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपल्याने सांगोला तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा, पेरू यासह इतर फळबागांचे आणि ज्वारी, मका, गहू तसेच पालेभाज्या या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके व फळबागा हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे.
सांगोला शहर आणि तालुक्यात दोन दिवस अवकाळी पावसाने तसेच गारपीटीने झोडपल्याने डाळिंब, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, सीताफळ, चिकू यासह इतर फळबागा आणि रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू यासह तरकारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे शेतातील उभी पिके कोलमडून पडली तर द्राक्ष पिकांना घडकुज कुजवा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्याच्या बागांनाही ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. मोहोर गळून गेल्याने आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीशी झगडत जतन केलेल्या फळबागा अवकाळी पावसाने उद्दवस्त झाल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभा राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सरसकट पंचमाने करून भरपाई द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे.
सांगोला तालुक्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसाळे शेती पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. अनेक शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी संघर्ष करत होते. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून असा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.
गुरुवार, १९ मार्च, २०२६
दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवीन अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन संपन्न*
शुक्रवार, १३ मार्च, २०२६
अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात प्रशासन सतर्क पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गॅस एजन्सी चालकांची घेतली बैठक; अवैध विक्री व साठेबाजीवर कडक कारवाईचा इशारा
अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात प्रशासन सतर्क पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गॅस एजन्सी चालकांची घेतली बैठक; अवैध विक्री व साठेबाजीवर कडक कारवाईचा इशारा.
गुरुवार, १२ मार्च, २०२६
दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,सांगोला येथे एक महिना पूर्णपणे मोफत मुत्ररोग निदान - उपचार, शस्त्रक्रिया शिबिर*
महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे: डॉ रचना साळे .
शुक्रवार, ६ मार्च, २०२६
सांगोला तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; मंडल अधिकारी व चालक अडचणीत.
बुधवार, ४ मार्च, २०२६
सांगोल्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईदरम्यान मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला
सांगोल्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईदरम्यान मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला.
सांगोला () : अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एका महसूल कर्मचाऱ्यास दुखापत झाली आहे.
फिर्यादी महेश गणपत जाधव (वय 38, रा. शिवाजीनगर, सांगोला) हे सांगोला तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तहसीलदार, Sangola यांच्या आदेशानुसार तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत भरारी पथक कार्यरत आहे.
गुप्त माहितीनुसार कारवाई
दि. ३ मार्च २०२६ रोजी मौजे जवळा येथील आगलावे वस्ती परिसरातील कोरड्या नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कडलास–जवळा रोडवर पहाटे सुमारे ३.०५ वाजता एक पांढऱ्या रंगाचा विनानंबर सहा टायर टिपर संशयितरित्या येताना दिसला. पथकाने वाहन थांबविल्यानंतर चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
तपासणीदरम्यान टिपरमध्ये अंदाजे ३ ब्रास वाळू आढळून आली. कोणतीही शासकीय रॉयल्टी अथवा परवानगी नसल्याने वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाकडे आणले जात होते.
क्रेटा गाडी आडवी लावून हल्ला
दरम्यान, मौजे कडलास येथे पहाटे ३.४० वाजण्याच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची विनानंबर क्रेटा गाडी पथकाच्या सरकारी वाहनासमोर आडवी लावण्यात आली. स्वतःला टिपरचा मालक असल्याचे सांगत अतुल गावडे याने वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत असलेल्या पप्पू बिचुकले यानेही शिवीगाळ व दमदाटी केली.
यावेळी दोघांनी दगडफेक करून सरकारी वाहन (क्र. MH 45 AL 8171) व खाजगी वाहन (क्र. MH 45 AU 6731) यांच्या समोरील काचा फोडल्या. या घटनेत महसूल सेवक सुनील गोडसे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे नख तुटून ते जखमी झाले. दोन्ही वाहनांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जप्त मुद्देमाल
अंदाजे ५ लाख रुपये किमतीचा विनानंबर सहा टायर टिपर (चेसिस नं. MAT373085D2P13700)
अंदाजे १४,२५० रुपये किमतीची ३ ब्रास वाळू
एकूण मुद्देमाल किंमत : ५,१४,२५० रुपये
घटनेनंतर पोलिसांना कळविण्यात आले असून दोघे आरोपी क्रेटा वाहनातून पसार झाले. याप्रकरणी अतुल गावडे, पप्पू बिचुकले (दोघे रा. जवळा ता. सांगोला) व अज्ञात टिपर चालकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण, दमदाटी व मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुढील तपास सांगोला पोलिसांकडून सुरू आहे.
गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी सतीशभाऊ सावंत यांची निवड.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी सतीशभाऊ सावंत यांची निवड.
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना 24 तास मदत करणार - सतीशभाऊ सावंत
सांगोला प्रतिनिधी -
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सह संपर्क प्रमुख पदी गोरगरिब रूग्णांना 24 तास मदत करणारे सतीशभाऊ सावंत यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ओएसडी व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पंढरपूर विभागाचे प्रमुख असताना सतीशभाऊ सावंत यांनी रुग्णांना अविरतपणे मदत केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनेक गरजू रुग्णांना भरीव मदत केली अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटून बिलामध्ये सवलती देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अनेक रुग्ण आर्थिक मदत करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले याची गंभीर दखल घेऊन राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्व खाली हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पश्चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी निवड केली आहे.
या पत्रामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात 10 % राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णता मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करणे संदर्भातील मार्गदर्शन करून सदैव तत्पर राहावे तसेच गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात आर्थिक सहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयात संपर्क साधावा असेही पत्रात संस्थापक अध्यक्ष व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी नमूद केले आहे निवडी नंतर सतीश भाऊ सावंत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
चौकट-
सतीशजी सावंत यांचे गोरगरिबांसाठी मोठे काम आहे जनतेसाठी अहोरात्र काम करणारा माणूस म्हणून दोन वेळा मतदारांनी त्यांच्या वर विश्वास टाकून निवडून दिले राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सतीशजी सावंत यांनी वैद्यकीय मदत कक्षा चे काम अतिशय चांगल्या प्रकारे करून गोरगरिबी रुग्णांना मदत करतील त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे सहसंपर्क पदावर नेमणुक केली आहे.
- मंगेश चिवटे ओएसडी
चौकट-
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख म्हणून राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे ओएसडी मंगेश चिवटे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली टाकलेल्या विश्वासास मी कायमच पात्र राहणार आहे या शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून रुग्णांना 24 तास मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे लवकरच शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या सांगोला तहसील कार्यालयासमोरील संपर्क कार्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध राहुन रूग्णंना मदत करणार आहे.
- सतीशभाऊ सावंत
- सह संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६
जवळा गाव आणि परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
जवळा गाव आणि परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ संपन्न
सांगोला : तालुका प्रतिनिधी
राजकारणात जय - पराजय होत असतात, एखाद्या पराजयाला खचून जाणारे साळुंखे कुटुंबीय नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे शत्रू किती मोठा आहे यापेक्षा आपल्यातील फितूर किती आहेत हे ओळखायला सुरुवात केली आहे. पाठीमागून चर्चा उठवण्यापेक्षा आणि रडीचा डाव न खेळता मैदानात येऊन सामना करावा असे ठणकावून सांगत, जवळा गावच्या आणि चार वाड्याच्या विकासासाठी जेवढं काही करता येईल तेवढं केले जाईल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही असा विश्वास माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.
कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी जवळा गावाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय दीपस्तंभ सारे शिकूया भारताचे दीपस्तंभ होऊया 25 फेब्रुवारी 2026 पासून रात्री 7 ते रात्री 9 पर्यंत जवळा गावातील मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद या संकल्पनेचा शुभारंभ काल मंगळवार दिनांक 24 रोजी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील बोलत होते.
या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, युवक नेते ॲड. यशराजे साळुंखे पाटील, भाजपाचे नेते संभाजी तात्या आलदर, सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, अरुणभाऊ घुले सरकार, सुनील आबा साळुंखे पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय रसाळ यांच्यासह ग्राम पंचायतीचे आजी-माजी सदस्य, तंटामुक्तीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, ज्येष्ठ मंडळी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील पुढे बोलताना म्हणाले, आत्मपरीक्षण करून पुढे कामाला सुरुवात केली आहे. गावच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यामध्ये इथून पुढच्या काळात कोणताही कागद आणायसाठी आता सांगोल्याला हेलपाटे मारावी लागणार नाहीत. कारण प्रत्येक कार्यालय आता एका छताखाली सुरू होत आहे. यामधून जवळा आणि जवळच्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांची निश्चितपणाने गैरसोय दूर होणार आहे. एक फूट जागा कोण कोणाला देत नाही अशा परिस्थितीत साळुंखे पाटील कुटुंबीयांनी प्रमुख चौकातील जागा दिली आहे. ही साळुंखे पाटील कुटुंबीयांची दानत आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज शासकीय इमारतीचे उद्घाटन होत असताना मला मनस्वी आनंद आहे. कारण आपल्याच गावातील वयोवृद्ध नागरिक महिला मुलींच्या शाळेची कामे या एकाच ठिकाणी होणार आहेत. कागदासाठी आता सांगोला जाण्याची गरज नाही. ही व्यवस्था होत असताना कार्यतपस्वी आमदार काकासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे काम आमच्यातून घडत आहे यातच मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी म्हणाले, सायंकाळी मोबाईल आणि टीव्ही बंद करून जवळा गावाने सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा आदर्श इतर गावांनी तालुक्यांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. यासह जवळा गावात एकाच छताखाली सर्व विभाग कार्यरत होणार असल्याने शासकीय योजना राबवताना सोयस्कर होणार आहे. यामध्ये प्रत्येक योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सज्जन मागाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जवळा व पंचक्रोशीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चौकट :
अतोनात प्रयत्नांतर शासकीय सर्व विभागीय कार्यालय एकाच छताखाली सुरू होणार आहेत. यामधून शासकीय कामे आपल्याच गावात पूर्ण होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामकाजाला गती मिळणार आहे. यामधून निश्चित पणाने नागरिकांच्या अडीअडचणी दूर होतील असा विश्वास आहे. हे शासकीय कार्यालय आपल्या श्री नारायण मंदिराच्या पावन नगरीत सुरू होत असून हे आपले भाग्य आहे.
ॲड . यशराजे दीपकआबा साळुंखे पाटील
सांगोला तालुक्यातील भूजल परिस्थितीबाबत केंद्रीय भूजल मंडळ, जलशक्ती मंत्रालयाचा सविस्तर अभ्यास अहवाल प्रकाशित.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अधिनस्थ कार्यालय केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर यांच्या वतीने आज दि. २४ फेब्रुवारी रोजी बचत भवन, पंचायत समिती, सांगोला येथे भूजल विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये भूजल संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जल व्यवस्थापनात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे.






























Social Media Icons