Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १७ मे, २०२६

नाझरे येथे वळण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी.

नाझरे येथे वळण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी.

नाझरे : येथील साठे नगर परिसरातील वळण रस्त्यावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने संबंधित ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आटपाडी सांगोला या मुख्य रस्त्यावर साठे नगर परीसर येत असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. विशेषतः दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने वळणावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यापूर्वीही काही किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवावेत तसेच इशारा फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शनिवार, १६ मे, २०२६

शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांनासाठी भाजप सरचिटणीस सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन.

शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांनासाठी भाजप सरचिटणीस सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन. 
सांगोला/प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित शासकीय प्रश्नांना गती मिळावी आणि त्यांच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, या उद्देशाने सोलापूर शहरात “सेवा अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षका च्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन दिले.

यावेळी रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक श्री. संतोषजी साखरे यांनी उपस्थित शिक्षक व पदवीधरांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, प्रलंबित शासकीय कामे आणि अपेक्षा जाणून घेतल्या. अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून शिक्षक व पदवीधरांना न्याय मिळवून देणे, हाच या “सेवा अभियानाचा” मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश संयोजक डॉ प्रशम कोल्हे सर,भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोक बबनराव उकिडे, पुणे विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.नारायण राजुरवार मा. आमदार भगवानराव साळुंखे , भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर अध्यक्ष रोहिणी ताई तडवळकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.शशिकांत चव्हाण, विक्रमजी देशमुख ,प्रा.डॉ रोंगे सर, प्रा सुरेशजी गुंड,प्रा प्रशांत शिंपी ,सरचिटणीस आमोल साखरे,दत्ता पाटील प्रा.संजय टोम्पे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

शनिवार, ९ मे, २०२६

ॲड. संदिप कागदे यांचे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप' विषयावर व्याख्यान संपन्न .

 ॲड. संदिप कागदे यांचे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप' विषयावर व्याख्यान संपन्न .


डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने तिसरे राष्ट्रीय महा अधिवेशन पणजी गोवा येथील कला अकादमी येथे ४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते, ह्या महा अधिवेशनाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या सत्रात विविध वैचारिक विषयावर चर्चा करण्यात आली.

ॲड. संदिप कागदे यांनी भारतीय राज्य घटना , मूलभूत अधिकार , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील निर्बंध , वैयक्तिक जीवनाचा अधिकार या सह अभिव्यक्ती स्वातंत्र्य संबंधातील विविध संविधानिक बाबी या बाबतीत सखोल व अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. 

पणजी येथे आयोजित डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महा अधिवेशनात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप'(CONSTITUTIONAL PRESPECTIVE OF FREEDOM OF SPEECH AND EXPRESSION) या विषयावर ते बोलत होते.

ह्यावेळी ॲड. संदिप कागदे यांना सन्मान चिन्ह ,शाल ,गुलाब पुष्प देऊन पणजीचे खासदार सदानंद शेठ तानावडे यांनी सत्कार केला.

या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंदशेठ तानावडे, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी उपस्थित होते. ह्यावेळी संपादक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शुक्रवार, ८ मे, २०२६

सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार - सभापती चेतनसिंह केदार*

*सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार - सभापती चेतनसिंह केदार*

*पाणी गुणवत्ते साठी आरोग्य कर्मचारी यांनी लक्ष द्यावे*

*आरोग्य समिती समिती सभा संपन्न*
सोलापूर - सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती  चेतनसिंह केदार यांनी दिली. 
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आरोग्य समिती सभा आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार - सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी समितीच्या सदस्या  सोनाली कडते, संगिता दुधाळ, शोभा खटकाळे, सविता कोकाटे, सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्तजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार उपस्थित होते.

या सभेमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी पारदर्शक पध्दतीने आरोग्य विभागाचा कारभार झाला पाहिजे. तुमच्या अडचणी असतील तर सांगा त्यावर मार्ग काढला जाईल.  ग्रामीण भागात पाणी गुणवत्ता चांगली राहणे साठी प्रयत्न करा. वेळेत पाणी नमुने तपासणी झाली पाहिजे. सध्या पाणी टंचाई लक्षात घेता गुणवत्तेकडे लक्ष द्या. 
तसेच ग्रामीण भागातील जनतेला श्वानदंश लस मिळाली पाहीजे. त्यासाठी जि.प.सेस मधुन ५०.०० लाख तरतुद आहे  परंतू या साठी  १५०.०० लक्ष (दिड कोटी) तरतुद अपेक्षित आहे. त्याबाबत पाठपुरावा करुन निधी प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आरोग्याच्या दृष्ट्रीने चांगले काम कसे होईल याचा आराखडा तयार करा. अशा सुचना सभापती केदार सावंत यांनी केल्या.
प्रत्येक प्रा.आ.केंद्राला भविष्यात सोलर सिस्टिम बसवण्याबाबतचे काय करता येईल याबाबतचे नियोजन करणे बाबत  जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना केल्या.अपंग मुलांचा सर्व्हे  करुन अपंग असलेल्या सर्वांना सर्टिफिकेट मिळणेबावत तालुकास्तरावर कॅम्प घेणेबाबत लवकर तालुका आरोग्य अधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या.
सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी आरोग्य समिती सभा अधुन मधुन तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात यावी अशी सुचना मांडली. गेल्या दोन वर्षापासुन तालुका आरोग्य अधिकारी यांचे वेगवेगळ्या गोष्टीवर खर्च केलेल्या गोष्टींचे बीले पेंडींग आहेत. त्याबाबत समन्वयातून मार्ग काढण्याबाबत व ती बीले त्यांना मिळणेबाबत आवश्यक त्या निधीसाठी पाठपुरावा करणेच्या सुचना दिल्या .
जि.प.सेस च्या २०२६-२७ च्या मुळ ५१०.०८ लक्षच्या मुळ अंदाजपत्रकाच्या विषयास शिफारस मान्यता घेण्यात आली.जिल्हा नियोजन समितीला सादर केलेल्या मंजूर आराखडयास शिफारस करणेसाठी मान्यता घेण्यात आली.

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन*

 


*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन*


 *गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कला अकादमी येथे होणार उद्घाटन* 


 


  देशातील सर्वात मोठी डिजिटल मीडियातील संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन पणजी गोवा येथील कला अकादमी येथे दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी १०  ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपन्न होणार असून या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, स्वागताध्यक्ष गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग मंत्री उदय सामंत, गोवा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री रमेश तवडकर,  कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे,अध्यक्ष आयुष्यभान भारत योजना महाराष्ट्र  ओमप्रकाश शेटे , गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर,खासदार सदानंद शेठ तानावडे, चंदगड चे आमदार शिवाजी पाटील, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ  यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष राजा माने व संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत व राज्य सचिव विकास भोसले  यांनी दिली.

   या पत्रकार परिषदेला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, महेश कुगावकर, राष्ट्रीय महासचिव तेजस राऊत,राज्य उपाध्यक्ष संजय भैरे,मुंबई विभाग अध्यक्ष शशिकांत देशमुख,राज्य संघटक मयूर गलांडे यांची उपस्थिती होती.

        डिजिटल मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक, तेलंगाना,आंध्र प्रदेश,पंजाब, दिल्ली या राज्यातून हजारो संपादक पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

     या महाअधिवेशनात  महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत  संपादक व मध्यम तज्ञ राजा माने हे घेणार असून यावेळी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी या पुरस्काराची घोषणा राजा माने यांनी केली.

      महा अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन केले असून  ऍड. संदीप कायदे (पंढरपूर )यांचे ’अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप’, ऍड.नकुल पार्सेकर (सावंतवाडी) यांचे ’समाजमाध्यमांचा न्यायालयीन प्रक्रियेतील अडथळा’...,सौमित्र देसाई, पूणे यांचे AI चा डिजिटल मीडियातील प्रभावी वापर   या विषयावर व्याख्यान होणार आहे.

 या ऐतिहासिक राष्ट्रीय अधिवेशनात डिजिटल मीडियातील विविध मागण्यांबाबत केंद्र व राज्य शासनाकडे ठराव यावर चर्चा करून अंतिम मसुदा सादर केला जाणार आहे.

  पणजी गोवा येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवेल, या महाधिवेशनाचा फायदा देशभरातील डिजिटल मीडियातील  संपादक पत्रकारांना खूप चांगल्या पद्धतीने होईल  असा विश्वास यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला.




 *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय वतीने पुरस्कारांची घोषणा*


 राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त मान्यवर 


 

1) श्री. कमलाकांत तारी,(गोवा ) गोवंश

 संवर्धक 


2) डॉ. महुवा शाह,(गोवा )

 शास्त्रज्ञ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी 


3) आमदार निलेश राणे , कुडाळ (विधिमंडळ उत्कृष्ट कार्य )



4)श्री. कमलेश बांदेकर, (गोवा )

योग प्रसारक


5)श्री दीपक नार्वेकर,(गोवा )

 उत्कृष्ट प्रशासन 


6)श्री. गुरुप्रसाद पावसकर, (गोवा )

आयुक्त, दिव्यांग संचालनालय


7) सौ. नेहा आंग्रे,गावस, (गोवा )

समाजसेवा 


8) मा.प्रकाश कुलकर्णी,मुंबई ( कृषी )


9)मा. माणिक तुकाराम शेडगे  सातारा ( सामाजिक कार्य )


10) मा. सौ.चित्राताई क्षीरसागर ,गोवा ( कवयित्री व साहित्यिक )


11) मा.निलेश भगवान सांबरे पालघर ( ग्रामसेवा )


12) प्रा. विशाल गरड,बार्शी ( प्रबोधन )


 13)सौ. राधा उत्तरेश्वर खताळ, वडवणी बीड( कार्यक्षम सरपंच )


14)मा. गोवर्धन दराडे ,बीड ( अनाथ संगोपन )


15)मा. संतोष ठोंबरे , बार्शी  ( उद्योग)


16) मा. पद्मज गुप्ता, नागपुर ( गो सेवा )


17) मा.राकेश अग्रवाल , मुंबई ( सामाजिक )


18) मा. राजेंद्र पाठक ,मुंबई ( बाल मदत )


19) मा. विकास देशमुख , मुंबई ( आरोग्य सेवा)


20) ग्रामविकास नागझरी 

( जलसंधारण व ग्रामविकास संस्थात्मक पुरस्कार )


रविवार, २६ एप्रिल, २०२६

सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी श्री. बाळासाहेब सावंत यांची निवड* *कार्यकर्तृत्वाला मिळाला सन्मान**

 *सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी श्री. बाळासाहेब सावंत यांची निवड* *कार्यकर्तृत्वाला मिळाला सन्मान**


पंढरपूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, जिल्हा सोलापूर (मुख्यालय पंढरपूर) या संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असून, सचिवपदी सहाय्यक कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब भीमराव सावंत यांची निवड करण्यात आली आहे. चेअरमनपदी श्री. चंद्रकांत जाधव, तर व्हॉईस चेअरमनपदी श्री. प्रशांत धावणे यांची निवड झाली आहे.

सोलापूर जिल्हाभर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेची स्वतःची सुमारे पाच गुंठ्यांवर उभारलेली दहा हजार चौरस फुटांची प्रशस्त इमारत आहे. संस्थेचे एकूण ६६२ सभासद असून, भागभांडवल सुमारे १५ कोटी रुपये आहे. संस्थेकडे ठेवी मोठ्या प्रमाणात जमा होत असून, सभासदांना सुलभ व जलद कर्जवाटप ही संस्थेची खास ओळख आहे. दरवर्षी नफ्यातून सुमारे ७.५ टक्के लाभांश (डिव्हिडंड) देत संस्था सातत्याने प्रगतीपथावर आहे.

नूतन सचिव म्हणून निवड झालेल्या श्री. बाळासाहेब सावंत हे केवळ अधिकारी म्हणूनच नव्हे तर समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. अत्यंत साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत विविध घटकांना एकत्र आणून काम उभे करण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे.

त्यांच्या वासुद गावातील वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन चळवळीत त्यांनी दिलेले योगदान विशेष दखलपात्र आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी उभारलेल्या उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये हरित चळवळीला चालना मिळाली आहे. गावकरी, शेतकरी, कामगार, नोकरवर्ग, उद्योगपती तसेच विविध पदाधिकाऱ्यांकडून निधी उभारणीची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वृक्षलागवडीसाठी निधी उभारणीला नवे बळ मिळाले असून, अनेक ठिकाणी हरित परिवर्तनाची नवी दिशा मिळाली आहे.

श्री. सावंत यांची प्रभावी संवादकला आणि फोटो-व्हिडिओच्या माध्यमातून उपक्रमांचे सादरीकरण करण्याची शैली ही त्यांच्या कार्याची वेगळी ओळख ठरली आहे. त्यांच्या जिवंत, उत्साही आणि प्रभावी कमेंट्रीमुळे सामाजिक उपक्रमांना व्यापक प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ते आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करतात, ही त्यांची खास जमेची बाजू आहे.

वासुद गावापुरते मर्यादित न राहता, सोलापूर जिल्हा तसेच आसपासच्या परिसरात त्यांचा व्यापक संपर्क व प्रभाव आहे. विविध स्तरांवरील लोकांशी असलेले त्यांचे सुसंवाद आणि समन्वय कौशल्य यामुळे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे अनेक उपक्रम भविष्यात अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

नूतन सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी भागभांडवल वाढविणे, कर्ज मर्यादा वाढविणे, कर्जावरील व्याजदर कमी करणे तसेच विशेष मोहीम उभारून संस्थेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा मानस व्यक्त केला आहे. सभासदांना अधिक सुलभ व पारदर्शक सेवा देण्यावर त्यांचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. बाळासाहेब सावंत यांच्या या निवडीमुळे त्यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्याचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था आणखी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. .


मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

उपक्रमशील आंबा उत्पादक शेतकरी : नवनाथ पोपट बाबर, चोपडी

 उपक्रमशील आंबा उत्पादक शेतकरी : नवनाथ पोपट बाबर, चोपडी 



सांगोला/ प्रतिनिधी: (दशरथ बाबर ) सांगोला तालुक्यातील चोपडी -बंडगरवाडी येथील प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी नवनाथ पोपट बाबर यांनी अर्थशास्त्र विषयातून पदवी संपादन केली असून संशोधक दृष्टीकोणामुळे अल्पावधीतच नावारूपाला येत आहेत. नवनाथ बाबर यांना एकूण १२ एकर शेती क्षेत्र असून २ एकर क्षेत्रावर आंब्याची बाग, ५०० झाडांची डाळिंब बाग व ४००झाडांची सीताफळाची बाग त्यांच्या शेतामध्ये आहे. नवनाथ बाबर यांनी आपल्या २ एकर क्षेत्रात आंब्याची लागवड केली आहे. ६०० आंबा झाडांपैकी सध्या ४५० झाडावरती आंबा बहरला आहे. आंबा उत्पादन घेत असताना त्यांनी आंबा झाडावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची कलमे बांधली आहेत. त्यांनी आंबा बागेत एका झाडावरती साधारण वीस प्रकारच्या आंब्याचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग राबवला आहे .दोन वर्षापूर्वी लागवड केलेल्या आंबा झाडावरती प्रचंड प्रमाणात मोहर आला होता .परंतु निसर्गाच्या  अवकृपेमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे . या आंब्यासाठी सेंद्रिय खते व औषधे यांचा वापर करण्यात आला आहे. कमी पाण्यावरती कमी खर्चात आंबा उत्पादनाचा यशस्वी प्रयोग राबवला आहे. त्यांना शेती उत्पादनासाठी त्यांच्या कुटुंबाची साथ 

मिळत आहे. 


 नवनाथ बाबर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आंबा लागवडीनंतर पाच वर्षापर्यंत आंब्याच्या झाडांना चांगले जोपासले पाहिजे. नवनाथ बाबर व आंबा उत्पादक मित्र परिवाराने महाकेशर फार्मर कंपनी नावाने ७०००आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला आहे. तसेच यामधून  निवडक ९ शेतकऱ्यांचा माणदेश महाकेशर आंबा ग्रुप तयार करण्यात आला आहे. महाकेशर फार्मर कंपनीचे सर्वेसर्वा नारायण पाटील सर संभाजीनगर यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे. नवनाथ बाबर यांनी आपल्या आंबा बागेसाठी केमिकल विरहित, ऑरगॅनिक खते- औषधे यांचा वापर केला आहे. ४५० झाडातून साधारण पाच टनांचे उत्पादन अपेक्षित असून आंबा विक्रीचे व्यवस्थापन स्वतः नवनाथ बाबर हे करणार आहेत. शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारची विक्री व्यवस्था तयार करण्यात येणार असून ग्राहकांना थेट केमिकल विरहीत दर्जेदार आंबा खायला मिळावा या दृष्टीने त्यांचा व ग्रुपचा प्रयत्न आहे.  त्यांच्या आंबा बागेस पत्रकार दशरथ बाबर व प्रगतशील शेतकरी सिद्धनाथ गुरव यांनी भेट देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले.



चौकट :

 ४५० आंब्याच्या झाडातून सुमारे ५ टन आंबा उत्पादन अपेक्षित आहे. आंब्याच्या बागेत सध्या हापूस, केशर, सोनपरी ,रत्ना, मियाझाकी, ब्लॅक कस्तुरी, बदामी, ॲप्पल मॅंगो, दशेरी पिठुळी, सिंधू, बनाना मॅंगो, खोबरी आंबा, रूमानी, एटीएम (वर्षभर आंबा) तोतापुरी, शेपू, वनराज, टोमॅटकीन आदी विविध प्रकारच्या व्हरायटी आंबा बागेमध्ये आहेत. येत्या आठ दिवसात आंबा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या दरम्यान स्वतः कलमे बांधून तयार केलेल्या आंब्याची नर्सरी सुरू करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांना अल्प किमतीमध्ये विविध प्रकारची दर्जेदार आंबा रोपे उपलब्ध करून शेतकऱ्यांचा विकास साधला जाईल. ---

नवनाथ पोपट बाबर, प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी (चोपडी- बंडगरवाडी) अधिक माहितीसाठी संपर्क :- मो.नं.९९२२१४६६२६


सोमवार, २० एप्रिल, २०२६

सीएफआय व बीएनवाय संस्थेमार्फत शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

 सीएफआय व बीएनवाय संस्थेमार्फत शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात 



पुणे:- सीएफआय व बीएनवाय संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे 2024-25 या सालाकरिता गरजू मुलामुलींना उच्च शिक्षणाकरिता मदत करण्यात आली. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनांतर्गत 22 हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. शैक्षणिक प्रगती चांगली असून पण कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे किंवा मुख्यत्वेकरून ज्या मुलांच्या डोक्यावर आई-वडिलांचे छप्पर हरविलेले आहे, या व अशा अनेक कारणांमुळे त्यांचं शिक्षण थांबू नये व त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये कोणतेही आर्थिक दडपण न ठेवता शिक्षण घेता यावे हा या मदतीमागचा मुख्य उद्देश होता.


मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

पांडुरंग सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

 पांडुरंग सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन 



सांगोला प्रतिनिधी :सांगोला शहरातील एसटी स्टँड परिसरातील वृत्तपत्र विक्रेते व सावंतवस्ती येथील रहिवाशी पांडुरंग लक्ष्मण सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय61 वर्षे होते 

त्यांच्या पश्चात आई ,बहिणी,पत्नी, एक मुलगा ,दोन मुली, भाऊ ,भाऊजय, पुतणे असा मोठा परिवार होता त्यांचेवर सावंतवस्ती येथील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सावंत वस्ती येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले


🎤 KHABARDAR NEWS 

✨ आवाज जनतेचा ✨

━━━━━━━━━━━━━━━

🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 

🟨 संपर्क: दत्तात्रय पवार

📞 मो:8007913668

सांगोला दापोली बसमुळे शेतकरी आणि पर्यटकांची सोय ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

 सांगोला दापोली बसमुळे शेतकरी आणि पर्यटकांची सोय ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सांगोला आगारातून सांगोला दापोली बसची सुरुवात  


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


सांगोला तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून तसेच नवनवीन विकसित केलेली संकरित फळझाडे आणण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे जात असतात तसेच सांगोला तालुक्यातील हजारो पर्यटक कोकणात निसर्ग दर्शन घ्यायला जात असतात सांगोल्यातून दापोलीला जाणाऱ्या शेतकरी आणि पर्यटकांची सांगोला दापोली या नवीन बासमुळे चांगली सोय होईल असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. 


मंगळावर दि १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सांगोला आगारातून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते सांगोला ते दापोली ही नवीन बस सुरू करण्यात आली. या बसचे उद्घाटन प्रसंगी दिपकआबा बोलत होते. यावेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, सांगोला आगारप्रमुख विकास पोफळे, शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष निळकंठ शिंदे सह सर्व पदाधिकारी तसेच आगारातील अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. यावेळी चालक आणि वाहनांचा सत्कार करण्यात आला. 

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी हा कष्टाळू आणि प्रयोगशील बनला आहे. त्यामुळेच सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळींब शेतीतून क्रांती केली. आज सांगोला तालुक्यात डाळींब द्राक्षे आंबा पेरू तसेच अन्य फळ पिकांच्या बागा दिमाखात उभ्या आहेत यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या कृषी विद्यापीठाचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच सांगोला तालुक्यातील पर्यटकांना नेहमीच कोकणचा नयनरम्य निसर्ग भुरळ घालत असतो त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी आणि पर्यटकांचे दापोली आणि संपूर्ण कोकणाशी अतूट नाते निर्माण झाले आहे हेच नाते अधिक घट्ट आणि दृढ करण्यासाठी सांगोला आगाराने सुरू केलेली सांगोला दापोली ही बस निश्चितपणे मदत करेल असा विश्वास शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.


रविवार, १२ एप्रिल, २०२६

वक्तृत्वाने सर्वांगीण विकास सहज शक्य : डॉ. रवींद्र आरळी

 वक्तृत्वाने सर्वांगीण विकास सहज शक्य : डॉ. रवींद्र आरळी 

(समर्थ संस्थेची जत येथे वक्तृत्व व संभाषण कौशल्य कार्यशाळा संपन्न)



जत:समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थे मार्फत 7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत 'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रमाणपत्र वितरण व समारोप समारंभ गंगाबाई गोब्बी शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालय जत येथे जत चे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या शुभहस्ते व उपस्थित संपन्न झाला.या उपक्रमाचे कौतुक करून महिलांना राजकीय क्षेत्रात यापुढे आरक्षणामुळे प्रचंड संधी असून त्यांनी आता वक्तृत्व कला शिकून आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हावे. वक्तृत्वातून सर्वांगीण विकास सहज शक्य असून, कुशल वक्तृत्वाची प्रत्येक क्षेत्रात गरज आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्य सेवा मंचचे उपाध्यक्ष माणिक कोडक सर यांनी वक्तृत्वाची कार्यशाळा हि काळाची गरज आहे, बोलण्याने प्रत्येक व्यक्तीला आपापल्या क्षेत्रात यश मिळवणे सोपे जाईल, समर्थ संस्थेने यापुढे असे उपक्रम राबवावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविकामध्ये दिगंबर साळुंखे सर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन संस्थेचा कार्यशाळा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला.यूट्यूब स्टार व ट्रेनर अनिल बन्ने फक्त बोलण्याच्या कौशल्यावर आम्ही दोन यूट्यूब चैनल चालवतो जत मध्ये सर्वात जास्त सबस्क्राईब चा सन्मान आम्हाला मिळाला. प्रशिक्षक मनीष काळे देशमुख यांनी महाराष्ट्रात दहाहजार पेक्षा जास्त वक्ते तयार करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी साहित्य सेवा मंच जतचे नूतन अध्यक्ष लवकुमार मुळे, उपाध्यक्ष माणिक कोडग सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लवकुमार मुळे यांनी साहित्य क्षेत्रात वक्तृत्व हा एक पाया असून सादरीकरणासाठी कुशल वक्तृत्व महत्वाचे असल्याचे नमूद केले.


        या कार्यशाळेस नगरसेविका संगीता सोनुले,नयना सोनवने, सुषमा सुर्वे,मनीषा साळे,माधुरी पाटील, स्वाती बडचिकर,अभिलाषा कोडग, मयुरी सावंत,राजश्री उबाळे,मुस्कान नदाफ, योजना वाघमारे यांच्यासह प्रशिक्षणार्थी नी सहभाग नोंदविला. यांना प्रमाणपत्र मेडल व ट्रॉफी चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका नम्रता सूर्यवंशी मॅडम व आभार समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी मानले.या कार्यक्रमास डॉ.सुर्वे,राजू कोळीसो, हेमंत भोसले, लोखंडे सर, व्यंकटेश राठोड सर, चव्हाणसो, डॉ. सतीश येलपले, भोसले सर, अरुण अरळी, प्रवीण निगडी यांच्यासह जतवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.







शनिवार, ११ एप्रिल, २०२६

भो जलिंगवाडी अंगणवाडी ( रानमळा चोपडी) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद: सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर

भो

जलिंगवाडी अंगणवाडी ( रानमळा चोपडी) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद: सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर

*भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात पालकांनी अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस यांच्या कार्याचा केला गौरव 

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी गावांतर्गत भोजलिंगवाडी ( रानमळा) अंगणवाडी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम हा उल्लेखनीय व गौरवास्पद ठरला आहे. या अंगणवाडी शाळेच्या सेविका मनीषा खळगे व मदतनीस सानिका जावीर यांनी विद्यार्थ्यावरती उत्कृष्ट प्रकारचे संस्कार करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी केलेली तयारी महत्त्वाची ठरली आहे. लहानपणी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक- शिक्षका यांचा मोलाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांसाठी लहानपणीच्या संस्काराची शिदोरी जीवनभर उपयुक्त ठरते. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार कौतुकास्पद आहेत असे मौलिक विचार सेवानिवृत्त सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांनी भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. 

शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेत आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी प्रमुखपाहुणे म्हणून अमोल बाबर बोलत होते . 
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पत्रकार दशरथ बाबर तसेच विद्यार्थ्यांचे पालक व युवावर्ग उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका मनीषा खळगे, मदतनीस सानिका जावीर तसेच चोपडी गावातील अलका बाबर, सविता चौगुले, विजया मेखले, पुनम जवंजाळ, शोभा जवंजाळ, ताई जावीर, सविता बाबर, उषा बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राहुल बाबर, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर बाबर, आगतराव चव्हाण, प्रताप बाबर, अमोल बाबर ,आकाश वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देत कौतुक केले .
या कार्यक्रमप्रसंगी पहिलीसाठी दाखल पात्र मुलांना प्रमुखपाहुणे अमोल बाबर यांच्या हस्ते विद्यारंभ प्रमाणपत्र देण्यात आले." गुढीपाडवा पट वाढवा "या उपक्रमांतर्गत हे प्रमाणपत्र देण्यात आले. तीन वर्षाच्या मुलांचा स्वागतोत्सव कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे वाढदिवसही केक कापून साजरे करण्यात आले. पालकांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांतर्गत लावणी, शालेयगीत, भावनिकगीत, लोकनृत्य, सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उलका निकम मॅडम यांनी केले. आकाश वाघमारे यांनी या कार्यक्रमासाठी मोफत साऊंड सिस्टिम सुविधा दिली. कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांचे आभार भोजलिंगवाडी अंगणवाडी सेविका मनीषा खळगे यांनी मानले




.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नलवडेवाडी येथे भव्य "कलाविष्कार 2026" कार्यक्रमाचे आयोजन

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नलवडेवाडी येथे भव्य "कलाविष्कार 2026" कार्यक्रमाचे आयोजन.



सांगोला :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नलवडेवाडी केंद्र उदनवाडी ता. सांगोला यांच्या भव्य पटांगणावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य "कलाविष्कार 2026 कार्यक्रम" रविवार दि. 12/04/2026 रोजी सायंकाळी 07:00 वा.आयोजित करण्यात आला आहे. तरी या स्नेहसंमेलनाच्या आनंदोत्सवात सहभागी होऊन पुन्हा एकदा बालपणात जाऊया व कार्यक्रमाची शोभा वाढवूया.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री.चेतनसिंह केदार सावंत(सभापती, आरोग्य व शिक्षण जि. प. सोलापूर) हे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. पूनम इंगवले (सभापती, पं.स. सांगोला) मा. श्री.अजय सरगर (उपसभापती पंचायत समिती सांगोला)मा. श्री. सुयोगजी नवले सो (गटशिक्षणाधिकारी, पं.स. सांगोला) तर प्रमुख उपस्थिती मा. सौ. संगीता संजय भोसले (सरपंच, ग्रा.पं. पाचेगाव खुर्द) मा. श्री. हणमंत तुकाराम मिसाळ (उपसरपंच ग्रा.पं. पाचेगाव खुर्द) माःश्री अमोल भंडारीसो. (शिक्षण विस्तार अधिकारी बीट कोळे) मा. श्री दिनकर गाडे केंद्रप्रमुख केंद्र उदनवाडी उपस्थित असणार आहेत. तसेच तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक ही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत पाचेगाव खुर्द, मा. अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जि. प. प्राथमिक शाळा नलवडेवाडी (पाचेगाव खुर्द), मा.मुख्याध्यापक, शिक्षक वृंद सर्व पालक जि.प.प्रा शाळा नलवडेवाडी (पाचेगाव खुर्द), अंगणवाडी सेविका, मदतनीसताई नलवडेवाडी (पाचेगाव खुर्द), समस्त ग्रामस्थ नलवडेवाडी ता. सांगोला हे आहेत. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे विविध कला सादरीकरण पाहण्याची सुंदर संधी आपणास मिळणार आहे. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये भव्य मोठा सुंदर शामियाना व निसर्गरम्य वातावरण , जुन्या हिंदी-मराठी गीतांची रेलचेल, उत्तम साउंड सिस्टम, डेकोरेशन, लाईट व्यवस्था,सर्वांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था तरी सर्व पालक, ग्रामस्थ, शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, शाळाप्रेमी व शिक्षणप्रेमी यांनी सहकुटुंब उपस्थित राहावे ही नम्र विनंती. चला, आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊया.



डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण*

*डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण*
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने गोवा येथे आयोजित करण्यात येत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली.
गेल्या पाच वर्षांपासून डिजिटल मीडिया क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली ही संघटना आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सात राज्यांत विस्तारलेल्या या संघटनेचे तब्बल १५ हजारांहून अधिक सक्रिय सभासद आहेत. संघटनेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन पणजी (गोवा) येथे पार पडणार असून, या अधिवेशनासाठी प्रमुख मान्यवरांपैकी एक म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सहसचिव लिंगराज साखरे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज तांबोळी, जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ वाघमोडे, माण तालुकाध्यक्ष नितीन वाघमोडे, खजिनदार संदीप जठार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सोमवार, ६ एप्रिल, २०२६

अजनाळे येथे अमानवीय कृत्य ,मतिमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी विजय कोळवले विरुद्ध गुन्हा दाखल

 अजनाळे येथे अमानवीय कृत्य ,मतिमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी विजय कोळवले विरुद्ध गुन्हा दाखल 



 सांगोला ;सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात घडलेल्या संतापजनक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या एका महिलेशी अत्यंत निर्लज्जपणे गैरवर्तन करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास विजय विठ्ठल कोळवले या व्यक्तीने पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्या वेळी महिला एकट्याच असल्याची संधी साधत आरोपीने घरात घुसून अमानुष कृत्य केले. स्वतःचे कपडे काढत पीडितेचे कपडे काढून तिच्या लज्जेचा भंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकाराची माहिती शेजारील महिलेच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर फिर्यादीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडितेकडून विचारपूस केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला असून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी आरोपी विजय विठ्ठल कोळवले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४ व ७६, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१)(w)(i) तसेच अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ अंतर्गत कलम ९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर अजनाळे गावात संतापाची तीव्र लाट उसळली असून आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



रविवार, ५ एप्रिल, २०२६

होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या नूतन सचिव पदी बिरू भंडगे यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची एकमताने निवड

 होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या नूतन सचिव पदी बिरू भंडगे  यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची एकमताने निवड 



होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटना तालुका सांगोला सदर संघटनेची बैठक दिनांक ५/४/२०२६ रोजी लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर बैठकीत पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली त्यामध्ये सचिव या पदावर मा. श्री. बिरू भंडगे (पाचेगाव खुर्द) यांची तर उपाध्यक्ष पदावर मा.श्री. विठ्ठल गेजगे (वाटंबरे) यांची नियुक्ती करण्यात आली. 


या निवडीला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. या कामे प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष मा.श्री.कुंडलिक भंडगे यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. मानाप्पा भडंगे , उपाध्यक्ष मा. श्री. विजय ऐवळे (चिंचोली), कार्याध्यक्ष मा.श्री. कुंडलिक भंडगे(अजनाळे), नूतन उपाध्यक्ष मा.श्री. विठ्ठल गेजगे(वाटंबरे), सहसचिव ह.भ.प. केशव हेगडे (सोनलवाडी), सदस्य मा.श्री.धनंजय भडंगे, मा.श्री. नारायण भंडगे आदी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे आधारस्तंभ लोकप्रिय आमदार मा. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सदर बैठक उत्साहात पार पडली व संघटनेच्या भावी कार्यास आमदारांनी शुभेच्छा दिल्या. आभार संघटनेचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. मानाप्पा भडंगे यांनी केले.


सोमवार, ३० मार्च, २०२६

स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी केले अभिवादन

स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी केले अभिवादन
सांगोला ; तालुका प्रतिनिधी 

सांगोला तालुक्याचे कार्यातपस्वी आमदार स्व काकासाहेब साळुंखे पाटील आणि भागवतभक्त स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी भेट देऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, भाजप नेते बाळासाहेब एरंडे, ॲड सचिन देशमुख, ॲड यशराजे साळुंखे पाटील, नूतन सभापती पूनम इंगवले, नवनाथ मगर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, चंद्रकांत चौगुले, पंचायत समिती सदस्य बापू जावीर, प्रशांत वलेकर जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे आदीसह मान्यवर उपस्थित होते. 

पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे हे रविवार दि २९ रोजी आपल्या नियोजित सांगोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जवळा येथील कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व भगवतभक्त स्वर्गीय शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. सांगोला तालुक्याच्या विकासासाठी स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, सांगोला तालुक्याच्या शाश्वत आणि दीर्घकालीन विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून स्व काकासाहेबांनी सांगोला तालुक्यातील शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले. त्याचबरोबर भगवतभक्त स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याला एक आध्यात्मिक संस्कार देऊन खऱ्या अर्थाने तालुक्यात वारकरी संप्रदायाचा अध्यात्मिक विचार रुजवला असेही यावेळी पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी स्पष्ट केले. 

रविवार, २९ मार्च, २०२६

चोपडी -रानमळा येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन.

 चोपडी -रानमळा येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन.



सांगोला/ प्रतिनिधी:( दशरथ बाबर): चोपडी (रानमळा) तालुका. सांगोला येथे मंगळवार दिनांक ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भोजलिंग यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता श्री. संदीप मोहिते महाराज व अतुल हातेकर महाराज यांचा भारुडाची जुगलबंदी कार्यक्रम आयोजित केला आहे.


 बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता सासनकाठीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता महिलांसाठी व पुरुषांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भव्य बक्षिसांचे आयोजन केले आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे. तर महिला व पुरुषांसाठी रस्सीखेच स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

 गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत .सकाळी ९ वाजता स्लो बाईक स्पर्धा होतील. संध्याकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता सिद्धेश्वर संगीत भजनी भारुड मंडळ दहिवडी यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

 शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता भव्य खुला रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धा लहान व मोठ्या गटात आयोजित केलेल्या आहेत. लहान गटासाठी अनुक्रमे ७ हजार रुपये ,५ हजार रुपये, ३ हजार रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत . मोठ्या गटासाठी अनुक्रमे २० हजार रुपये,१५ हजार रुपये ७ हजार रुपये, व ५ हजार रुपये असा बक्षीसांचा खजिना देण्यात येणार आहे.यात्रेच्या व कार्यक्रमाच्या संदर्भात अमोल बाबर  ९४२०५६१९५५ व राहुल बाबर ९७६३०४०९५८ या मोबाईल क्रमांकावर  संपर्क साधावा . श्री भोजलिंग यात्रा कमिटी चोपडी (रानमळा) व ग्रामस्थ यांनी या यात्रेचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी भाविक- भक्त व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .


शनिवार, २८ मार्च, २०२६

समर्थ संस्थेमार्फत जत येथे भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 समर्थ संस्थेमार्फत जत येथे भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 



वाटंबरे: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थामार्फत'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे जत येथे 7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध लेखक,वक्ता व प्रभावी भाषण कला प्रशिक्षक मनीष काळे लाभले आहेत.    

              या प्रशिक्षण वर्गामध्ये भाषण कसे करावे,भाषणाची सुरुवात कशी करावी,आत्मविश्वास निर्माण करणे,भाषणासाठी विषय व मुद्दे कसे निवडावे,श्रोत्यांबद्दल माहिती,विषय,सादरीकरण ,भाषणाचे पाठांतर ,विशिष्ट भाषाशैली,भाषण रंगवणे,भारदस्त दमदार आवाज,प्रसंगावधान राखणे ,भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे,भाषणाचा शेवट कसा करावा या सर्व संवाद भाषण कला व संवाद कौशल्याचा सराव व तयारी करून घेण्यात येणार आहे.त्याचबरोबर प्रात्यक्षिक व सराव मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असून अत्यंत कमी व माफक प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्यांनी दिगंबर साळुंखे 9049106853, मनीषा साळे 7385162037 व अभिलाषा कोडग 9359881452 यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान समर्थ बहुउद्देशीय एका संस्थेमार्फत करण्यात आले आहे.


शुक्रवार, २७ मार्च, २०२६

श्रीराम नवमी निमित्त वासुद येथे कुस्तीचा थरार; लाखोंच्या इनामांसह जंगी मैदान रंगले

 श्रीराम नवमी निमित्त वासुद येथे कुस्तीचा थरार; लाखोंच्या इनामांसह जंगी मैदान रंगले



श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त वासुद येथे पारंपरिक मल्लविद्येचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या अनेक लहान-मोठ्या कुस्त्या रंगल्या. एकूण सुमारे पाच लाख रुपयांचे इनाम मल्लांना वितरित करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.




या मैदानाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या तब्बल ₹1,00,000 इनामाच्या कुस्तीत नेपाळचे पैलवान देवा थापा यांनी हिमाचल प्रदेशच्या नदीम चौहान यांच्यावर मात करत विजेतेपद पटकावले. तसेच सांगलीचे पैलवान विशाल शेळके यांनी आटपाडीच्या रणजीत आगलावे यांच्यावर विजय मिळवत प्रेक्षकांची दाद मिळवली.इतर झालेल्या कुस्त्यांमध्ये खवासपूरचे अर्जुन चव्हाण यांनी म्हसवडच्या प्रसाद फुकळे यांचा पराभव केला. खवासपूरचे करण खटके यांनी दत्ता बोडरे यांच्यावर मात केली, तर पियुष वाडेकर (खवासपूर) यांनी आटपाडीच्या भैय्या खरात यांना चितपट केले.




       काही कुस्त्या अत्यंत चुरशीच्या ठरल्या. कामतीचे सुलेखान शेख व बामणीचे विनोद शिनगारे तसेच कुंभारीचे सुशांत शेजुळ व खवासपूरचे विकास निंबाळकर यांच्यातील कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या, ज्यामुळे प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केले.इतर निकालांमध्ये खवासपूरचे गणेश आवताडे यांनी आटपाडीच्या यश देवकते यांचा पराभव केला, तर मानेगावचे ज्ञानेश्वर सावंत यांनी खवासपूरच्या विकास कोळी यांच्यावर विजय मिळवला.

            या भव्य मैदानाचे आयोजन वासुद येथील जुने हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते. तसेच लहान व मोठ्या कुस्त्यांचे सामने हनुमान मंदिर परिसरात दुपारी 1 वाजल्यापासूनच रंगले होते, ज्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमास वस्ताद कृष्णा शेंडगे (सर), दगडू चौगुले, बजवळकर बुवा बडरे, दादा व्हनमाने, सहदेव लेंडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी स्वतः आखाड्यात उतरून पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.

        कुस्ती निवेदनाची जबाबदारी क्रीडा भूषण पुरस्कारप्राप्त पैलवान कृष्णा शेंडगे (सर) यांनी प्रभावीपणे पार पाडली. यावेळी सागर पाटील, यशराजे साळुंखे पाटील, अतुल पवार, योगेश खटकाळे, गुंडा दादा खटकाळे ,मोहन बापू आलदार, डॉ.शिवराज भोसले, डॉ.विजय बंडगर,डॉ.महेश राऊत,डॉ.महादेव जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


श्रीराम मंडळाचे सदस्य:


भीमराव सावंत, प्रकाश केदार, वसंतराव शिंदे, शहाजी पाटील, विठ्ठल नाना केदार, सुभाष शिंदे, पोपट भोरे, अरविंद केदार, राहुल भोरे, सुनील भोरे, दत्ता केदार, प्रकाश भोरे, सुनील केदार, अशोक गोरे, अशोक शास्त्री, गोपाळ मराळ, राहुल केदार, गोपी केदार, डॉ. निरंजन केदार, अंकुश सावंत, मधुकर पवार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

        एकंदरीत, वासुद येथील या भव्य कुस्ती मैदानाने श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करत पारंपरिक मल्लविद्येला नवे बळ दिले. गावकऱ्यांनी व परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart