Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

वासुद गांवचे सुपुत्र डॉ.निरंजन आनंदराव केदार यांचा आरोग्य क्षेत्रातील "जीवन- संजीवन पुरस्काराने" सन्मान*

*वासुद गांवचे सुपुत्र डॉ.निरंजन आनंदराव केदार यांचा आरोग्य क्षेत्रातील "जीवन- संजीवन पुरस्काराने" सन्मान*
सांगोला : 
डॉ. निरंजन आनंदराव केदार (एम.डी.मेडिसिन) एक निष्णात डॉक्टर आणि तितकाच संवेदनशील माणूस….लहानपणापासूनच कलेच्या प्रांगणात वावरल्यामुळं अंगी बाणलेली संवेदनशीलता आणि खेळाच्या मैदानातून मिळालेली शिस्त, यांचा उत्कृष्ट संगम म्हणजे डॉ. निरंजन आनंदराव केदार.सांगोला तालुक्यातील क्रांतिकारी गांव म्हणून ओळख असणाऱ्या मु.पो.वासुद-अकोला,गांवचे डॉ.निरंजन केदार सुपुत्र आहेत, सांगोला सारख्या ग्रामीण भागांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. केदार यांचे वडील श्री.आनंदराव गणपती केदार हे रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते .श्री.आनंदाराव केदार सरांनी घराच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या जोरावर आपल्या कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारे कर्तृत्वाने गरिबीवर मात करत आपल्या तीनही मुलांनी उच्य विद्याविभूषित केले.डॉ. निरंजन केदार हे त्यांचे द्वितीय नंबरचे चिरंजीव ….कऱ्हाडच्या श्री. सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिर,कराड येथे बालवाडी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पंढरपूरच्या यशवंत विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण अव्वल नंबर मिळवून पूर्ण केलं.

 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेतून अत्यंत चांगल्या गुणांची गुणवत्ता मिळवून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आणि शासकीय महाविद्यालयात वैद्यकीय डॉक्टरकीचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मार्ग सुखर झाला.बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये घेतल्यामुळे कर्मवीर आण्णांच्या जीवनपटाचा आणि प्रेरणादायी विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला…आयुष्याच्या जडणघडणीत याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे…पदवीचे उच्य शिक्षण घेण्यासाठी ते सातारच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात ते डॉक्टरकीचे धडे गिरवण्यासाठी वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी कला, क्रीडा सांस्कृतिक,साहित्यिक,सामाजिक, राजकीय, वैद्यकीय या सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या नेतृत्वसंपन्न कर्तृत्वचा ठसा उमटवण्याचा त्यांनी श्रीगणेशा केला.. डॉक्टरकीची पदवी संपादन करताचं त्यांना साताऱ्यातील डॉक्टरांच्या संघटनेने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील समाजोपयोगी काम बघून त्यांना आदर्श विद्यार्थी ,आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय ,सातारा हा पुरस्कार बहाल केला. बेळगांवच्या नामांकित के.एल.ई. विद्यापीठातून डॉक्टरकीचे पदव्युत्तर शिक्षण घेताना डॉ.निरंजन केदार यांनी परराज्यात असून देखील आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा के.एल.ई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर विद्यार्थी हा पुरस्कार मिळवला आणि सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला…

        आरोग्य ,कला,क्रीडा,सामाजिक क्षेत्रांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा गौरव झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते सांगोला तालुक्यात केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर माणुसकीच्या भावनेनं आणि सामाजिक जाणिवेतून “रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा” मानून ते वैद्यकीय सेवा देत आहेत. अनेकदा मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरं, रक्तदान शिबिरं,विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून ते समाजाची सेवा करत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीनं आणि उच्च दर्जाचे मोफत वैद्यकीय उपचार शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळावेत,यासाठी अहोरात्र धडपडणारे डॉक्टर म्हणून त्यांची परिसरात ख्याती आहे.कला,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील कबड्डी, शरीरसौष्ठव अशा खेळांमध्ये अश्वमेध ,आंतरराज्य आणि ऑल इंडिया आंतर विद्यापीठ स्तरावर नेतृत्व करून मैदान गाजवणारे डॉ. निरंजन केदार हे खिळाडूवृत्ती जोपासणारे ते एक यशस्वी खेळाडू तर आहेतच त्यासोबत इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन या शरीरसौष्टव (बॉडीबिल्डिंग) संघटनेचे ते राष्ट्रीय पंच म्हणून देखील काम करतात. अंगी नेतृत्वगुण असल्यामुळं समाजातील विविध वंचित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न ते करतात. 

*चौकट- "डॉ निरंजन केदार यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांचा विचाराचा वारसा रुजवण्याचे काम ते अत्यंत संवेदनशीलपणे करत आहेत. सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम तर करत आहेतच. परंतु त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये निरपेक्षपणे मोलाची मदत करत आहेत. हे विशेष उल्लेखनीय त्यांचे काम विचारात घ्यावेच लागेल. भविष्यात अशी चांगली माणसं समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय होणे ही समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे."*
     अशा समाजभान असणाऱ्या व संशोधकवृत्तीच्या डॉ. निरंजन केदार यांचे अनेक रिसर्च पेपर Pubmed Scopus या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. अशा या हरहुन्नरी कलावंताला आणि नेतृत्वगुणसंपन्न अष्टपैलू डॉक्टर समाजसेवकाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोरगरीब गरजू रुग्णांना नव संजीवनी देऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल *जीवन संजीवन पुरस्कार* मिळाल्याबद्दल सामाजिक राजकीय वैद्यकीय अनेक क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांच्या पुढील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

भरधाव कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार.

 भरधाव कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार.



वाटंबरे/ प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती सांगोला तालुक्यातील जुनोनी हद्दीत बरगाव कारणे पाठीमागून मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवार दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ, करांडेवाडी फाटा येथे घडली.

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात  विजय रघुनाथ भंडारे (वय 28, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सिद्राम संजय आयवळे (वय 23, रा. मजरेवाडी, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयवळे हा त्याच्या ताब्यातील चिव्होरलेट कंपनीच्या MH-02-BM-0815 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्यावेळी त्याने हिरो कंपनीची MH-45-AA-0535 क्रमांकाची मोटारसायकल चालवणारे अजय रघुनाथ भंडारे (वय 35, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत अजय भंडारे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलीचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ  घोंगडे करीत आहेत.


शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.

 चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत  बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.



सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी येथे जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यामध्ये प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत सुरेश बाबर यांचा सन्मान करण्यात आला.

अभिजीत बाबर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये नामांकित कंपनीमध्ये तीन वर्षे नोकरी केली. कोरोनाच्या काळात नोकरी सोडून गावी येऊन आपली शेती हीच इंडस्ट्री म्हणून काम सुरू केले. शेती ही ढोबळमानाने न करता वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून केली तरच शेती फायद्याची ठरेल. शेती करत असताना सेंद्रिय ,रासायनिक आणि जैविक या खतांचा योग्य वापर करून शेती केली तर फायदेशीर ठरते. शेतीमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन निघेल असे ध्येय ठेवले तरच शेती आणि शेतकरी यांचे समीकरण जुळते. अभिजीत बाबर यांनी भाजीपाला व डाळिंब शेतीमध्ये प्रगती करून नवलौकिक मिळवला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रगतशील युवा शेतकरी गुलाबराव भीमराव बाबर यांनी डाळिंब, द्राक्षे, ढोबळी मिरची या पिकाच्या माध्यमातून शेतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून नावलौकिक मिळवला. त्यांचाही सर्वत्र गौरव होत आहे. शिवजयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी :सुनीलबापू लाड

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी :सुनीलबापू लाड 



*चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


सांगोला /प्रतिनिधी: (दशरथ बाबर) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बदलत्या युगात इतिहास व धार्मिक ग्रंथ अभ्यासणे गरजेचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व गोष्टीत पारंगत केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसुर्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य रयतेसाठी सर्वधर्मसमभावाचे असे होते. देव, देश, धर्म रक्षणासाठी जिजाऊंनी पुत्ररत्न प्राप्त व्हावा अशी देवाकडे प्रार्थना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या पिढीने आचरणात आणले पाहिजेत .जिजाऊंनी सार्वभौम राजा घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खूप मोठे संस्कार केले .छत्रपती शिवाजी महाराजांनी 1644 ला तोरणा किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधले. क्रूर अशा अफजलखानाचा वध करून रयतेला खऱ्या अर्थाने न्याय दिला. चोपडी येथील शिवस्मारक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचेही तैल चित्र लावावे व दररोज पूजन करावे. शिवतीर्थाच्या ठिकाणी गावातील व्यक्तींचे वाढदिवस साजरे करून त्यांच्यामध्ये इतिहासाविषयी आपुलकी व प्रेरणा निर्माण करावी असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते सुनीलबापू लाड यांनी चोपडी येथे व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ बाबर हे होते.



चोपडी तालुका सांगोला येथे शिवजन्म उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते  सुनीलबापू लाड यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सुनील बापू लाड, डॉ, नवनाथ बाबर, उपसरपंच पोपट यादव , बाळासाहेब यादव, उद्योगपती सुभाष बाबर, उद्योगपती सतीश पाटील,चेअरमन भिकाजी बाबर, चेअरमन दगडू बाबर, जनार्दन बाबर सर , पत्रकार दशरथ बाबर आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समाजासमोर आणणे गरजेचे आहे. जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती सोहळा अखंडपणे प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. हा कौतुकास्पद सोहळा निश्चितच गावातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉल्बी मुक्त शिवजयंती उत्सव साजरा करणे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन व्याख्याते सुनीलबापू लाड यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशर माती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रगतशील शेतकरी सतीश पाटील यांनी केले. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरू करण्याची प्रथा बाळासाहेब यादव यांनी सुरू केली असून ही प्रथा आजही अखंडपणे मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे . जयंतीनिमित्त सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक , नोकरी , व्यवसाय, शेतीक्षेत्र आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्यास सलाम केला जातो.  शिवरायांच्या प्रतिमेची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चोपडी गावातील बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चोपडीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच शिवप्रेमींनी पारंपारिक मर्दानी खेळ, लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली . भजनी मंडळानेही टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये मिरवणुकीत शोभा वाढवली.तसेच हलगीच्या तालावरती लेझीम खेळाडूंनी आपली कला सादर केली. मिरवणुकीमध्ये अबालवर्धानी सहभाग घेतला होता. जय शिवराय, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून लवकरच शिवस्मारक पूर्णत्वास येईल. शिवजयंती सोहळ्यानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी मोटरसायकल रॅली काढून जनजागृतीबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय ,अशा घोषणा देऊन इतिहासाविषयी जनजागृती केली. प्राथमिक शाळा व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास दृष्टिक्षेपात आणला. वक्तृत्व स्पर्धेसाठी राजकुमारशेठ भोसले यांनी 10000 हजार रुपयांचे बक्षीस दिले. तसेच चेअरमन भिकाजी बाबर यांनीही विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. मंडळाने विद्यार्थ्यांना व त्यांच्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळवून दिले. वेगवेगळ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी कबीर मुलाणी व सहकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर गौरवपर पोवाडा सादर केला. सुभाषशेठ बाबर यांनी शिवगौरवपर कविता सादर केली. शिवजयंती सोहळ्यासाठी मदत करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला. आर्मीमध्ये निवड झालेल्या व कार्यरत असणाऱ्या तरुणांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रतीक दत्तात्रय बाबर ,प्रदीप प्रकाश खंडागळे, रितेश संजय खंडागळे,

अतुल दिलीप चव्हाण,सुमित ज्ञानेश्वर बाबर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रगतशील डाळिंब उत्पादक प्रगतशील शेतकरी अभिजीत सुरेश बाबर,

गुलाब भीमराव बाबर यांचा सन्मान करून त्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थाने सलाम करण्यात आला. पुरवठा अधिकारी विशाल मेखले यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बजरंग बाबर व सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील कालिदास जवंजाळ सर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे तसेच कार्यक्रमानिमित्त उपस्थितांचे आभार सेवानिवृत्त सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांनी केले.


माण नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक; बोलेरो पिकअपसह ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 माण नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक; बोलेरो पिकअपसह ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त



सांगोला (प्रतिनिधी):

सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.नं. 139/2026 प्रमाणे बी.एन.एस. कलम 303 (2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये बेकायदेशीर वाळू वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी पोना/1228 सुजित रामचंद्र जाधव (वय 39 वर्षे, नेमणूक सांगोला पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 6.30 वाजण्याच्या सुमारास मौजे चिनके (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील चिनके ते माण नदीपात्राकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, दिलावर तांबोळी यांच्या शेताजवळ कारवाई करण्यात आली.

या कारवाईत आरोपी तानाजी महादेव शितोळे (वय 25 वर्षे, रा. चिनके, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बोलेरो चारचाकी पिकअप (आरटीओ क्रमांक MH 10 BR 0227) वाहनातून शासनाची रॉयल्टी न भरता व कोणतीही अधिकृत परवानगी न घेता माण नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून वाहतूक करताना आढळून आला.

पोलीसांनी कारवाईदरम्यान अंदाजे ५,००,००० रुपये किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन तसेच सुमारे ७,००० रुपये किंमतीची अंदाजे एक ब्रास वाळू असा एकूण ५,०७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध बी.एन.एस. 2023 चे कलम 303 (2) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्दी रिपोर्ट मा. न्यायालयात सादर करण्याची तजवीज करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ/1264 भानवसे हे करीत असून, दाखल प्रक्रिया पोहेकॉ/138 भोसले यांनी केली आहे.

बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

पत्रकारांच्या मुला - मुलींच्या करिअर साठी केलेल्या मदतीबद्दल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा बार्शीत पत्रकारांच्या वतीने सत्कार

पत्रकारांच्या मुला - मुलींच्या करिअर साठी केलेल्या मदतीबद्दल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा बार्शीत पत्रकारांच्या वतीने सत्कार



बार्शी /प्रतिनिधी:

पत्रकारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान देणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) पाटील यांचा बार्शी येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या गरजांसाठी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल बार्शीतील पत्रकारांनी ग्रामदैवत भगवंताची मूर्ती भेट देऊन दादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे संचालक तथा ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेत, मंत्री पाटील यांनी पत्रकारांसाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रेरणेने व आश्रयाने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत राज्यभरातील पत्रकारांना तब्बल १७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. ही मदत पत्रकारांच्या मुलांच्या करिअर घडविण्यासाठी शैक्षणिक सहाय्य तसेच गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी देण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचे सामाजिक व वैयक्तिक आयुष्य सुदृढ राहणे अत्यावश्यक आहे, या जाणिवेतून दादांनी पुढाकार घेतल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनी दादांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, पत्रकारांच्या अडचणी ओळखून त्यावर तत्परतेने मदतीचा हात देणे ही दुर्मीळ बाब आहे. आर्थिक मदतीसोबतच पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख अधिक दृढ झाली आहे. बार्शीतील या सत्कार सोहळ्याने पत्रकार बांधवांच्या एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा भाव अधोरेखित केला. पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल राज्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.सत्कार प्रसंगी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्षा निता देव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बसवंत तसेच संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

समर्थ संस्थेमार्फत भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 समर्थ संस्थेमार्फत भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 



वाटंबरे: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थामार्फत'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे वाटंबरे येथे 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध लेखक,वक्ता व प्रभावी भाषण कला प्रशिक्षक मनीष काळे लाभले आहेत.    

              या प्रशिक्षण वर्गामध्ये भाषण कसे करावे,भाषणाची सुरुवात कशी करावी,आत्मविश्वास निर्माण करणे,भाषणासाठी विषय व मुद्दे कसे निवडावे,श्रोत्यांबद्दल माहिती,विषय सादरीकरण ,भाषणाचे पाठांतर ,विशिष्ट भाषाशैली,भाषण रंगवणे,भारदस्त/दमदार आवाज,प्रसंगावधान राखणे ,भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे,भाषणाचा शेवट कसा करावा या सर्व संवाद भाषण कला व संवाद कौशल्याचा सराव व तयारी करून घेण्यात येणार आहे.त्याचबरोबर प्रात्यक्षिक व सराव मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असून अत्यंत कमी व माफक प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्यांनी दिगंबर साळुंखे 9049106853 व भाग्यवान पवार 9561546144 यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान समर्थ बहुउद्देशीय एका संस्थेमार्फत करण्यात आले आहे.



Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart