खबरदार न्युज पोर्टल सांगोला मुख्य संपादक दत्तात्रय पवार मोबा 8007913668, या न्युज पोर्टल वर प्रकाशित बातमी शी संपादक सहमत असतीलच नाही. कोणताही वाद सांगोला न्यायालयाच्या कक्षेत.
अपघातमुक्त सांगोलाच्या दिशेने सांगोला पोलिसांचा जनजागृती उपक्रम
सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यात वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत सांगोला शहर व परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन न चालविणे, तसेच निष्काळजी वाहन चालविण्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणारे आकर्षक फलक उभारण्यात आले आहेत. तसेच अपघातग्रस्त दुचाकी वाहन प्रदर्शित करून अपघाताच्या भीषण परिणामांची जाणीव नागरिकांना करून देण्यात येत आहे.
"Helmet is costly, But Brain is priceless!" या प्रभावी संदेशाद्वारे दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून दिले जात असून, "अति घाई संकटात नेई" या संदेशातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या जनजागृती उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातांबाबत जागरूकता निर्माण करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.
सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करून स्वतःसह इतरांच्याही जीविताचे रक्षण करावे, असे आवाहन सांगोला पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज; नियोजनाचा आढावा :- भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत
कासेगाव, (पंढरपूर) : आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दर्जेदार, तत्पर व अखंडित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज. या अनुषंगाने कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नियोजन व आढावा बैठक पार पडली.
सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वारी मार्गावरील आरोग्य सुविधा, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, औषधसाठा, रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्कालीन उपचार सेवा, चरण सेवा, मुख्यमंत्री वारकरी सुविधा उपचार केंद्र, मुख्यमंत्री वारकरी निवारा उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्यदूत, मेडिसिन किट, उष्माघात व संसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता आणि प्रत्येक पालखी सोबत ALS रुग्ण वाहिका देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली. वारकऱ्यांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाचा महत्त्वपूर्ण सोहळा असून, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. आषाढी वारीदरम्यान कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण उद्भवू नये, यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही यावेळी सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.
याबैठकीस आरोग्य समिती सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, शोभाताई खटकाळे, सविताताई कोकाटे, संगीताताई दुधाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्री. सतीश कोपुरवाड तसेच या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
चौकट :
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज
“आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर समाजाप्रती असलेली आपली सेवा आहे. प्रत्येक वारकऱ्याला वेळेत, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने व तत्परतेने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
भाजप सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याची मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) कार्यशाळा उत्साहात संपन्न :- जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत
भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याच्या वतीने मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision - SIR) अभियानाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन टेंभुर्णी येथे करण्यात आले.
या कार्यशाळेस SIR प्रभारी, महाराष्ट्र राज्य तसेच मध्यप्रदेश राज्याचे महामंत्री व आमदार मा. श्री. भगवानदासजी सबनानी साहेब यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन अभियानाचे महत्त्व, कार्यपद्धती, अंमलबजावणी आणि प्रत्येक बूथवर अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक मा. श्री. विक्रमजी देशमुख साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी बूथ सक्षमीकरण, संघटनात्मक बांधणी आणि मतदार यादी पुनरावलोकन अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेस भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, BLA 1, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आणि अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ॲड. संदिप कागदे यांचे 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी :
मराठी पत्रकार संघ पंढरपूर यांच्या वतीने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र ता.पंढरपूर येथे 26 जून 2026 रोजी 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,
कार्यक्रमाच्या सत्रात विविध वैचारिक विषयावर चर्चा करण्यात आली.
ॲड. संदिप कागदे यांनी भारतीय राज्य घटना , मूलभूत अधिकार , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील निर्बंध , वैयक्तिक जीवनाचा अधिकार, अब्रूनुकसानीचा कायदा या सह पत्रकारितेशी संबंधित विविध कायदेशीर बाबींवर उपस्थित पत्रकारांना सविस्तर मार्गदर्शन केले. वृत्तांकन करताना पत्रकारांनी कायद्याच्या चौकटीत राहून जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली. तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच पत्रकारांची कर्तव्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयी त्यांनी मार्गदर्शन केला.
ॲड. संदिप कागदे यांचे शिक्षण बी. एस. सी., एल. एल. एम., सेट, नेट. (B.Sc.,L.L.M.,S.E.T., N.E.T) आहे. त्यांना विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल व महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्दल विश्वभूषण डॉ. बाबा साहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर च्या वतीने "विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार" देउन गौरवण्यात आले आहे. सत्र न्यायालय व मुंबई उच्चन्यायालय येथे विविध प्रकारच्या फौजदारी केसेस चालवन्याचा त्यांना अनुभव आहे, कायदा, शिक्षण, युवा सक्षमीकरण आणि पत्रकार सक्षमीकरण ह्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
चिंचणी येथे आयोजित मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप'(CONSTITUTIONAL PRESPECTIVE OF FREEDOM OF SPEECH AND EXPRESSION) आणि अब्रूनुकसानीचा कायदा (LAW OF DEFAMATION) या विषयावर ते बोलत होते.
ह्यावेळी ॲड. संदिप कागदे यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन जेष्ठ पत्रकार हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सत्कार केला.
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास संघटनेचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड यांनी केले होते.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी पत्रकार संघटनेच्या विधायक उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राचे मोहन अनपट, सचिन कुलकर्णी, प्रवीण नागणे यांनी पत्रकार संघटनेच्या विधायक उपक्रमांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद पोतदार यांनी केले.
या प्रसंगी डी राज सर्वगोड,कल्याण कुलकर्णी, रामकृष्ण बिडकर, दत्तात्रय पाटील, विनोद पोतदार, लखन साळुंखे, व्याख्याते व लेखक किरण निकम, कबीर देवकुळे, अमोल गुरव, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल माने तसेच मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र शाखा, पंढरपूरचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे पत्रकारांना पत्रकारितेतील कायदेशीर पैलूंची अधिक स्पष्ट माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
माझ्या अध्यापनाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न घडवता सुजाण नागरिक घडवण्याचे काम केले : तानाजी खंडागळे
(श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेत सेवानिवृत्ती पर सोहळा आयोजित)
वाट़बरे/प्रतिनिधी:
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेत मी जून 1992 ला रुजू झालो व 31 मे या प्रशालेतून 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. या प्रशालेचे संस्थापक कै. दा.सु.पवार सर यांनी या संस्थेत मला नोकरी दिली फक्त नोकरी दिली नाही तर माणसं दिली, नाती दिली तसेच मला खऱ्या अर्थाने घडवण्याचे काम पवार सरांनी केले .सेवानिवृत्ती पर आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले की मी अध्यापनाचे कार्य करताना इंग्रजी आणि राज्यशास्त्र या दोन विषयाचे अध्यापन केले इंग्रजीचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजीची असणारी भीती लक्षात घेता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इंग्रजी सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल व विद्यार्थ्यांना ते कसे समजेल हे मी पहिले तसेच राज्यशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकविला आज या प्रशालेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत याचा मला अभिमान वाटतो माझ्या नोकरीच्या कार्यकाळात सुखदुःखात कुटुंबातील सदस्य , माझे सहकारी व संस्था माझ्या पाठीमागे वेळोवेळी उभी राहिली त्यामुळे या सर्वांचा मी शेवटपर्यंत ऋणी राहीन .
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेत गुरुवार दि. 2 जूलै रोजी शाळेचे सहशिक्षक तानाजी खंडागळे यांच्या सेवानिवृत्ती पर सोहळा आयोजित केला होता या वेळी यशवंत हायस्कूल शिरभावी चे सहशिक्षक शहाजी घाडगे रा .हातीद हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचाही यावेळी प्रशालेच्या वतीने सत्कार घेण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या वतीने तानाजी खंडागळे व त्यांच्या कुटुंबाचा शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला तसेच शहाजी घाडगे यांचा ही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यास प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक, तसेच तानाजी खंडागळे सरांचा मित्रपरिवार ,वाटंबरे ग्रामस्थ हतीद ग्रामस्थ तसेच प्रशालेतील माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत वाटंबरे ,विकास सेवा सोसायटी वाटंबरे तसेच गावातील विविध संस्थेचे चेअरमन तसेच विविध मान्यवरांनी शिक्षकांचा शाल ,फेटा ,श्रीफळ देऊन सत्कार केला .
यावेळी शाळेचे संस्थापक मोहन पवार सर, माजी विद्यार्थी, सरांचे सहशिक्षक तसेच त्यांचे मित्रपरिवार व नातेवाईकांनी आपल्या मनोगतातुन सरांच्या विविध पैलूंची माहिती देत सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पिंटू पवार सर यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इयत्ता पाचवीची मंजुरी. :- शिक्षण व आरोग्य सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत
सोलापूर | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार उच्च प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाच्या दि. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील (GR) निकषांची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे.
शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांच्या शिफारशीनुसार मा. श्री. कुशल जैन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी वर्गवाढीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासन निर्णयातील सर्व अटी व निकषांची पडताळणी करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागत होते. वाहतुकीची अडचण, आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली, शिक्षण अर्धवट सोडत असल्याची समस्या निर्माण होत होती. आता गावातच पाचवीचा वर्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा गळती रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पालकांचा आर्थिक व मानसिक ताणही कमी होणार आहे.
या निर्णयामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला घराजवळच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणाला यामुळे बळ मिळणार आहे.या निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.
चौकट
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी २३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवी सुरू करण्यास मंजुरी मिळाली, ही आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे शाळा गळती कमी होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठे बळ मिळेल. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील.”ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे.
– मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद सोलापूर
सांगोला (वाटंबरे )येथील भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि 30 जून रोजी दुःखद निधन झाले. निधना समय त्यांचे वय 61 होते त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,चार मुली असा परिवार आहे.
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दि. 2 जुलै रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांचे नातेवाईकांनी दिली.
Social Media Icons