*अमृत महोत्सवाचे सुवर्णपर्व: करांडे स्कूलमध्ये ४७ पत्रकारांचा गौरव*
सांगोला (प्रतिनिधी)
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्ष २०२६-२७ निमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, ड्रीम फाउंडेशन सोलापूर, करांडे इंटरनॅशनल स्कूल जुजारपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने जुजारपूर येथील करांडे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे सांगोला तालुका पत्रकार कार्यशाळा व कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्यातून समाजाच्या आशा-आकांक्षांना व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच समाजप्रबोधनाचे कार्य अविरत चालू ठेवावे, असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक, दैनिक सकाळचे माजी निवासी संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक अभय दिवाणजी यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे व म.सा.प. सांगोला शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके हे होते. यावेळी व्यासपीठावर निमंत्रक ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी, करांडे इंटरनॅशनल स्कूलचे श्रीधर करांडे व समन्वयक, म.सा.प प्रमुख कार्यवाह प्रा. धनाजी चव्हाण उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सांगोला विद्यामंदिर येथे पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर करांडे स्कूल जुजारपूर येथे विद्यार्थ्यांच्या बहारदार स्वागतसत्राने तसेच गणेश वंदन आणि सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी दांडपट्टा व मल्लखांबाचे चित्तथरारक सादरीकरण केले. यावेळी श्रीधर करांडे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित पत्रकारांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.
दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर, निमंत्रक आणि ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या ओघवत्या प्रास्ताविकातून त्यांनी या कार्यक्रमाचा मुख्य हेतू स्पष्ट केला. स्वतः शून्यातून विश्व निर्माण करणारे, सायकलीवरून थेट दिल्ली गाठणारे आणि 'भाकरीवाला' अशी सर्वसामान्यांत आपली आगळीवेगळी ओळख जपणारे भतगुणगी हे एक ध्येयवेडे आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या मनोगतातून, पत्रकारांना एकाच छताखाली आणून वैचारिक विचारमंथन घडवणे आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव करणे, हाच या कार्यक्रमाचा उदात्त उद्देश असल्याचे सांगत सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले.
यानंतर उद्घाटन सत्रामध्ये अभय दिवाणजी यांचे बीजभाषण पार पडले. यावेळी पत्रकारांच्या वतीने पत्रकार मनोज उकळे यांनी आपल्या मनोगतात या सुंदर आयोजनासाठी संयोजकांचे कौतुक केले.चौथा स्तंभ म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या सांगोला तालुक्यातील ४७ पत्रकारांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य चारुदत्त जगताप, विविध क्षेत्रांतील मान्यवर, म.सा.प. सांगोला शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, करांडे कुटुंबीय,करांडे स्कूलचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर व सुनील जावंजळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. धनाजी चव्हाण यांनी मानले.
*चौकट १*
*पत्रकारितेने समाजाचा आरसा बनून सत्यनिष्ठेने कार्य करावे — ज्येष्ठ* पत्रकार अभय दिवाणजी
आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी पत्रकारितेतील बदलते स्वरूप आणि डिजिटल युगातील आव्हाने यावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सध्याच्या सोशल मीडियाच्या आणि वेगाने धावणाऱ्या बातम्यांच्या काळात बातमीदारीची अचूकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. पत्रकारांनी केवळ घटनांची नोंद न ठेवता, त्यामागील सत्य शोधून काढत बातमीतील वस्तुनिष्ठता जपावी. वृत्तलेखनाची जबाबदारी पार पाडताना समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हे पत्रकारितेचे खरे सामाजिक उत्तरदायित्व आहे. सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण जडणघडणीत येथील स्थानिक पत्रकारांनी दिलेले योगदान अत्यंत दिशादर्शक असून, भविष्यातही लोकशाहीचा हा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी निर्भयपणे, निपक्षपातीपणे आणि सत्यनिष्ठेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
*चौकट २*
*अमृत महोत्सवी वाटचालीत पत्रकारांची भूमिका मोलाची — प्रा. प्रबुद्धचंद्र झपके*
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ७५ वर्षांच्या देदीप्यमान अमृत महोत्सवी वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, गेली सात दशके संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, गुणवत्ता आणि शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. या प्रदीर्घ शैक्षणिक ज्ञानयज्ञात पत्रकारांनी नेहमीच सत्याची कास धरून संस्थेचे कार्य समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोलाचे काम केले. समाजातील घडामोडींचे अचूक पडसाद उमटवतानाच पत्रकारांनी आपल्या विधायक लेखणीतून नेहमीच समाजमनाची योग्य बांधणी केली आहे. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना, पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करता आला याचा मनस्वी आनंद आहे. पत्रकारांनी भविष्यातही अशीच निर्भीडपणे सत्याची बाजू मांडावी आणि समाजाला प्रबोधनाची व विकासाची दिशा देण्याचे कार्य अविरत सुरू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


















Social Media Icons