Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

सांगोला तालुक्यातील भूजल परिस्थितीबाबत केंद्रीय भूजल मंडळ, जलशक्ती मंत्रालयाचा सविस्तर अभ्यास अहवाल प्रकाशित.

 सांगोला तालुक्यातील भूजल परिस्थितीबाबत केंद्रीय भूजल मंडळ, जलशक्ती मंत्रालयाचा सविस्तर अभ्यास अहवाल प्रकाशित.
.......................
[ केंद्रीय भूजल विभागाच्या माध्यमातून भूजलवैज्ञानिकांनी केलेल्या सविस्तर अभ्यास अहवालातील माहितीचा वापर करून स्थानिक पातळीवर भूजल व्यवस्थापन अद्ययावत करणे शक्य आहे : उपेंद्र धोंडे, वरिष्ठ भूजलवैज्ञानिक, केंद्रीय भूजल मंडळ.]
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अधिनस्थ कार्यालय केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर यांच्या वतीने आज दि. २४ फेब्रुवारी रोजी बचत भवन, पंचायत समिती, सांगोला येथे भूजल विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये भूजल संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जल व्यवस्थापनात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्री. उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते व केंद्रीय भूजल विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. एस एस पूर्ती व उपेंद्र धोंडे तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ. मुश्ताक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
यावेळी बोलताना श्री. उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, पाण्याचा वापर काटकसरीने करणे, वृक्षारोपण वाढवणे आणि जलव्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे ही काळाची गरज आहे. पुढील काही महिन्यांत ग्रामसेवक व सरपंचांनी आपापल्या गावात यासंबंधी कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत. 
या कार्यक्रमाचा भाग म्हणून श्री. एस एस पूर्ती, श्री. अमरनाथ व श्री. उपेंद्र धोंडे या केंद्रीय भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच डॉ. मुश्ताक शेख, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालय, सोलापूर यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. 
यावेळी बोलताना डॉ. मूश्ताक शेख यांनी सांगितले की, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सोलापूर हि सांगोला तालुक्यातील भूजल पातळी परिस्थितीबाबत सखोल माहितीची नोंद ठेवते, स्थानिक प्रशासनाने या माहितीचा उपयोग करून जनमानसात जलजागृती केली पाहिजे. इतर तांत्रिक सत्रात श्री. एस एस पूर्ती यांनी राष्ट्रीय जलधर नकाशाकरण अभ्यास अहवाल, सांगोला याचे सविस्तर सादरीकरण केले, श्री. अमरनाथ यांनी भूजल पुनर्भरण विषयावर मार्गदर्शन केले. श्री. उपेंद्र धोंडे यांनी उपस्थितांशी स्थानिक भूजल समस्या व त्याचे निराकरण याबद्दल खेळीमेळीने संवाद साधला, यावेळी स्थानिकांनी भूजलाची घसरती पातळी व शेततळी, तसेच भूजल पुनर्भरण संरचना अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी याबद्दल उत्स्फूर्तपणे प्रश्नं विचारले तसेच आपापल्या गावातील अनुभव कथनही केले. 
यावेळी केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्री. वैजिनाथ घोंगडे यांचा सन्मान करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक , सरपंच, जलसुरक्षक, जलदूत तसेच स्थानिक सामाजिक संस्था प्रतिनिधी अशा एकूण ९५ सहभागींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने श्री. अमरनाथ, उज्ज्वल कुमार आणि इतर सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. 

अधिक माहितीसाठी संपर्क:
उपेंद्र धोंडे 9271000195

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

डॉ.शीतल अजळकर सांगोला-पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा लवकरच सुरू करणार.

डॉ.शीतल अजळकर सांगोला-पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा लवकरच सुरू करणार.
ग्रामीण मातांसाठी आशेचा नवा किरण; ग्रामीण महाराष्ट्रात नवजात अतिदक्षता सेवेला नवे बळ
सांगोला/प्रतिनिधी ः
महानगरांमध्ये उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेतून ग्रामीण भागातील मातांसाठी आणि नवजात बाळांसाठी सेवा देण्याचा धाडसी व संवेदनशील निर्णय घेत डॉ. शीतल सौरभ अजळकर (एमबीबीएस, एमडी - बालरोग, डीआरएनबी - नवजात शिशुशास्त्र) या सांगोला व पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा सुरू करण्यास सज्ज झाल्या असून लवकरच सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या भागातील गरजु रूग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
डॉ. शीतल अजळकर यांनी डीआरएनबी (नवजात शिशुशास्त्र) ही उच्च तज्ज्ञ पदवी संपादन केली असून त्यांनी या क्षेत्रातील भारतातील अत्यंत प्रतिष्ठित म्हणून नावलौकिक असलेल्या रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटल हैद्राबाद येथे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
डॉ. शीतल या सांगोला येथील सुप्रसिद्ध कै. डॉ. शंकरराव अजळकर यांच्या स्नुषा तसेच डॉ. अजळकर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. सौरभ अजळकर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
अकाली जन्मलेली बाळे, जन्मतः अत्यल्प वजनाची (1 किलोपेक्षा कमी वजनाची) बाळे तसेच जन्मानंतर तात्काळ किंवा नंतर उद्भवणार्‍या गुंतागुंतीच्या व गंभीर आजारांचे अत्याधुनिक व तज्ज्ञ व्यवस्थापन करण्याचा त्यांना विशेष अनुभव आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील रूग्णांना होणार आहे.
नवजात संसर्ग, श्‍वसनाचा त्रास, कावीळ, जन्मावेळी मेंदूला ऑक्सिजनचा अभाव (बर्थ अ‍ॅस्फिक्सिया), नवजात बालकांतील फुफ्फुसांतील उच्च रक्तदाब (पीपीएचएन), जन्मजात चयापचय विकार, जन्मजात व आनुवंशिक आजार, मेंदू, हृदय, मूत्रपिंड व पचनसंस्थेचे गंभीर विकार तसेच स्तनपान किंवा आहाराशी संबंधित अडचणी - अशा प्रत्येक नवजात जीवासाठी संपूर्ण व प्रगत सेवा उपलब्ध करून देण्यात डॉ.शीतल अजळकर निष्णात आहेत.
उच्च वारंवारतेचा व्हेंटिलेटर (एचएफओव्ही), श्‍वसनासाठी नायट्रिक ऑक्साइड वायू उपचार, जन्मावेळी ऑक्सिजनअभावी झालेल्या मेंदूविकारासाठी नियंत्रित शीतोपचार पद्धती तसेच उच्च जोखमीच्या नवजात बालकांचे विशेष रुग्णवाहिकेद्वारे व हवाई मार्गाने सुरक्षित स्थलांतर या क्षेत्रातही त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

चौकट ः
आजवर अशा प्रकारच्या उपचारांसाठी पालकांना पुणे-मुंबईसारख्या महानगरांकडे धाव घ्यावी लागत होती; मात्र आता महानगरस्तरीय नवजात अतिदक्षता सेवा सांगोला-पंढरपूर परिसरातच उपलब्ध होणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील त्यांच्या पुढील नियोजनाचा अधिक तपशील लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक नवजात जीव म्हणजे एक विश्‍व आणि त्या विश्‍वाच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञ हात आता आपल्या जवळ आहेत. अशी ही डॉक्टर शितल अजळकर यांनी सांगितले

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

वासुद गांवचे सुपुत्र डॉ.निरंजन आनंदराव केदार यांचा आरोग्य क्षेत्रातील "जीवन- संजीवन पुरस्काराने" सन्मान*

*वासुद गांवचे सुपुत्र डॉ.निरंजन आनंदराव केदार यांचा आरोग्य क्षेत्रातील "जीवन- संजीवन पुरस्काराने" सन्मान*
सांगोला : 
डॉ. निरंजन आनंदराव केदार (एम.डी.मेडिसिन) एक निष्णात डॉक्टर आणि तितकाच संवेदनशील माणूस….लहानपणापासूनच कलेच्या प्रांगणात वावरल्यामुळं अंगी बाणलेली संवेदनशीलता आणि खेळाच्या मैदानातून मिळालेली शिस्त, यांचा उत्कृष्ट संगम म्हणजे डॉ. निरंजन आनंदराव केदार.सांगोला तालुक्यातील क्रांतिकारी गांव म्हणून ओळख असणाऱ्या मु.पो.वासुद-अकोला,गांवचे डॉ.निरंजन केदार सुपुत्र आहेत, सांगोला सारख्या ग्रामीण भागांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. केदार यांचे वडील श्री.आनंदराव गणपती केदार हे रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते .श्री.आनंदाराव केदार सरांनी घराच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या जोरावर आपल्या कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारे कर्तृत्वाने गरिबीवर मात करत आपल्या तीनही मुलांनी उच्य विद्याविभूषित केले.डॉ. निरंजन केदार हे त्यांचे द्वितीय नंबरचे चिरंजीव ….कऱ्हाडच्या श्री. सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिर,कराड येथे बालवाडी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पंढरपूरच्या यशवंत विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण अव्वल नंबर मिळवून पूर्ण केलं.

 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेतून अत्यंत चांगल्या गुणांची गुणवत्ता मिळवून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आणि शासकीय महाविद्यालयात वैद्यकीय डॉक्टरकीचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मार्ग सुखर झाला.बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये घेतल्यामुळे कर्मवीर आण्णांच्या जीवनपटाचा आणि प्रेरणादायी विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला…आयुष्याच्या जडणघडणीत याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे…पदवीचे उच्य शिक्षण घेण्यासाठी ते सातारच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात ते डॉक्टरकीचे धडे गिरवण्यासाठी वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी कला, क्रीडा सांस्कृतिक,साहित्यिक,सामाजिक, राजकीय, वैद्यकीय या सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या नेतृत्वसंपन्न कर्तृत्वचा ठसा उमटवण्याचा त्यांनी श्रीगणेशा केला.. डॉक्टरकीची पदवी संपादन करताचं त्यांना साताऱ्यातील डॉक्टरांच्या संघटनेने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील समाजोपयोगी काम बघून त्यांना आदर्श विद्यार्थी ,आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय ,सातारा हा पुरस्कार बहाल केला. बेळगांवच्या नामांकित के.एल.ई. विद्यापीठातून डॉक्टरकीचे पदव्युत्तर शिक्षण घेताना डॉ.निरंजन केदार यांनी परराज्यात असून देखील आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा के.एल.ई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर विद्यार्थी हा पुरस्कार मिळवला आणि सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला…

        आरोग्य ,कला,क्रीडा,सामाजिक क्षेत्रांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा गौरव झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते सांगोला तालुक्यात केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर माणुसकीच्या भावनेनं आणि सामाजिक जाणिवेतून “रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा” मानून ते वैद्यकीय सेवा देत आहेत. अनेकदा मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरं, रक्तदान शिबिरं,विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून ते समाजाची सेवा करत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीनं आणि उच्च दर्जाचे मोफत वैद्यकीय उपचार शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळावेत,यासाठी अहोरात्र धडपडणारे डॉक्टर म्हणून त्यांची परिसरात ख्याती आहे.कला,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील कबड्डी, शरीरसौष्ठव अशा खेळांमध्ये अश्वमेध ,आंतरराज्य आणि ऑल इंडिया आंतर विद्यापीठ स्तरावर नेतृत्व करून मैदान गाजवणारे डॉ. निरंजन केदार हे खिळाडूवृत्ती जोपासणारे ते एक यशस्वी खेळाडू तर आहेतच त्यासोबत इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन या शरीरसौष्टव (बॉडीबिल्डिंग) संघटनेचे ते राष्ट्रीय पंच म्हणून देखील काम करतात. अंगी नेतृत्वगुण असल्यामुळं समाजातील विविध वंचित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न ते करतात. 

*चौकट- "डॉ निरंजन केदार यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांचा विचाराचा वारसा रुजवण्याचे काम ते अत्यंत संवेदनशीलपणे करत आहेत. सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम तर करत आहेतच. परंतु त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये निरपेक्षपणे मोलाची मदत करत आहेत. हे विशेष उल्लेखनीय त्यांचे काम विचारात घ्यावेच लागेल. भविष्यात अशी चांगली माणसं समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय होणे ही समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे."*
     अशा समाजभान असणाऱ्या व संशोधकवृत्तीच्या डॉ. निरंजन केदार यांचे अनेक रिसर्च पेपर Pubmed Scopus या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. अशा या हरहुन्नरी कलावंताला आणि नेतृत्वगुणसंपन्न अष्टपैलू डॉक्टर समाजसेवकाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोरगरीब गरजू रुग्णांना नव संजीवनी देऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल *जीवन संजीवन पुरस्कार* मिळाल्याबद्दल सामाजिक राजकीय वैद्यकीय अनेक क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांच्या पुढील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

भरधाव कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार.

 भरधाव कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार.



वाटंबरे/ प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती सांगोला तालुक्यातील जुनोनी हद्दीत बरगाव कारणे पाठीमागून मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवार दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ, करांडेवाडी फाटा येथे घडली.

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात  विजय रघुनाथ भंडारे (वय 28, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सिद्राम संजय आयवळे (वय 23, रा. मजरेवाडी, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयवळे हा त्याच्या ताब्यातील चिव्होरलेट कंपनीच्या MH-02-BM-0815 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्यावेळी त्याने हिरो कंपनीची MH-45-AA-0535 क्रमांकाची मोटारसायकल चालवणारे अजय रघुनाथ भंडारे (वय 35, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत अजय भंडारे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलीचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ  घोंगडे करीत आहेत.


शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.

 चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत  बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.



सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी येथे जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यामध्ये प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत सुरेश बाबर यांचा सन्मान करण्यात आला.

अभिजीत बाबर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये नामांकित कंपनीमध्ये तीन वर्षे नोकरी केली. कोरोनाच्या काळात नोकरी सोडून गावी येऊन आपली शेती हीच इंडस्ट्री म्हणून काम सुरू केले. शेती ही ढोबळमानाने न करता वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून केली तरच शेती फायद्याची ठरेल. शेती करत असताना सेंद्रिय ,रासायनिक आणि जैविक या खतांचा योग्य वापर करून शेती केली तर फायदेशीर ठरते. शेतीमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन निघेल असे ध्येय ठेवले तरच शेती आणि शेतकरी यांचे समीकरण जुळते. अभिजीत बाबर यांनी भाजीपाला व डाळिंब शेतीमध्ये प्रगती करून नवलौकिक मिळवला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रगतशील युवा शेतकरी गुलाबराव भीमराव बाबर यांनी डाळिंब, द्राक्षे, ढोबळी मिरची या पिकाच्या माध्यमातून शेतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून नावलौकिक मिळवला. त्यांचाही सर्वत्र गौरव होत आहे. शिवजयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी :सुनीलबापू लाड

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी :सुनीलबापू लाड 



*चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


सांगोला /प्रतिनिधी: (दशरथ बाबर) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बदलत्या युगात इतिहास व धार्मिक ग्रंथ अभ्यासणे गरजेचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व गोष्टीत पारंगत केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसुर्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य रयतेसाठी सर्वधर्मसमभावाचे असे होते. देव, देश, धर्म रक्षणासाठी जिजाऊंनी पुत्ररत्न प्राप्त व्हावा अशी देवाकडे प्रार्थना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या पिढीने आचरणात आणले पाहिजेत .जिजाऊंनी सार्वभौम राजा घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खूप मोठे संस्कार केले .छत्रपती शिवाजी महाराजांनी 1644 ला तोरणा किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधले. क्रूर अशा अफजलखानाचा वध करून रयतेला खऱ्या अर्थाने न्याय दिला. चोपडी येथील शिवस्मारक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचेही तैल चित्र लावावे व दररोज पूजन करावे. शिवतीर्थाच्या ठिकाणी गावातील व्यक्तींचे वाढदिवस साजरे करून त्यांच्यामध्ये इतिहासाविषयी आपुलकी व प्रेरणा निर्माण करावी असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते सुनीलबापू लाड यांनी चोपडी येथे व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ बाबर हे होते.



चोपडी तालुका सांगोला येथे शिवजन्म उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते  सुनीलबापू लाड यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सुनील बापू लाड, डॉ, नवनाथ बाबर, उपसरपंच पोपट यादव , बाळासाहेब यादव, उद्योगपती सुभाष बाबर, उद्योगपती सतीश पाटील,चेअरमन भिकाजी बाबर, चेअरमन दगडू बाबर, जनार्दन बाबर सर , पत्रकार दशरथ बाबर आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समाजासमोर आणणे गरजेचे आहे. जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती सोहळा अखंडपणे प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. हा कौतुकास्पद सोहळा निश्चितच गावातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉल्बी मुक्त शिवजयंती उत्सव साजरा करणे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन व्याख्याते सुनीलबापू लाड यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशर माती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रगतशील शेतकरी सतीश पाटील यांनी केले. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरू करण्याची प्रथा बाळासाहेब यादव यांनी सुरू केली असून ही प्रथा आजही अखंडपणे मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे . जयंतीनिमित्त सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक , नोकरी , व्यवसाय, शेतीक्षेत्र आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्यास सलाम केला जातो.  शिवरायांच्या प्रतिमेची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चोपडी गावातील बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चोपडीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच शिवप्रेमींनी पारंपारिक मर्दानी खेळ, लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली . भजनी मंडळानेही टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये मिरवणुकीत शोभा वाढवली.तसेच हलगीच्या तालावरती लेझीम खेळाडूंनी आपली कला सादर केली. मिरवणुकीमध्ये अबालवर्धानी सहभाग घेतला होता. जय शिवराय, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून लवकरच शिवस्मारक पूर्णत्वास येईल. शिवजयंती सोहळ्यानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी मोटरसायकल रॅली काढून जनजागृतीबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय ,अशा घोषणा देऊन इतिहासाविषयी जनजागृती केली. प्राथमिक शाळा व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास दृष्टिक्षेपात आणला. वक्तृत्व स्पर्धेसाठी राजकुमारशेठ भोसले यांनी 10000 हजार रुपयांचे बक्षीस दिले. तसेच चेअरमन भिकाजी बाबर यांनीही विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. मंडळाने विद्यार्थ्यांना व त्यांच्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळवून दिले. वेगवेगळ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी कबीर मुलाणी व सहकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर गौरवपर पोवाडा सादर केला. सुभाषशेठ बाबर यांनी शिवगौरवपर कविता सादर केली. शिवजयंती सोहळ्यासाठी मदत करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला. आर्मीमध्ये निवड झालेल्या व कार्यरत असणाऱ्या तरुणांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रतीक दत्तात्रय बाबर ,प्रदीप प्रकाश खंडागळे, रितेश संजय खंडागळे,

अतुल दिलीप चव्हाण,सुमित ज्ञानेश्वर बाबर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रगतशील डाळिंब उत्पादक प्रगतशील शेतकरी अभिजीत सुरेश बाबर,

गुलाब भीमराव बाबर यांचा सन्मान करून त्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थाने सलाम करण्यात आला. पुरवठा अधिकारी विशाल मेखले यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बजरंग बाबर व सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील कालिदास जवंजाळ सर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे तसेच कार्यक्रमानिमित्त उपस्थितांचे आभार सेवानिवृत्त सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांनी केले.


माण नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक; बोलेरो पिकअपसह ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 माण नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक; बोलेरो पिकअपसह ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त



सांगोला (प्रतिनिधी):

सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.नं. 139/2026 प्रमाणे बी.एन.एस. कलम 303 (2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये बेकायदेशीर वाळू वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी पोना/1228 सुजित रामचंद्र जाधव (वय 39 वर्षे, नेमणूक सांगोला पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 6.30 वाजण्याच्या सुमारास मौजे चिनके (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील चिनके ते माण नदीपात्राकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, दिलावर तांबोळी यांच्या शेताजवळ कारवाई करण्यात आली.

या कारवाईत आरोपी तानाजी महादेव शितोळे (वय 25 वर्षे, रा. चिनके, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बोलेरो चारचाकी पिकअप (आरटीओ क्रमांक MH 10 BR 0227) वाहनातून शासनाची रॉयल्टी न भरता व कोणतीही अधिकृत परवानगी न घेता माण नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून वाहतूक करताना आढळून आला.

पोलीसांनी कारवाईदरम्यान अंदाजे ५,००,००० रुपये किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन तसेच सुमारे ७,००० रुपये किंमतीची अंदाजे एक ब्रास वाळू असा एकूण ५,०७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध बी.एन.एस. 2023 चे कलम 303 (2) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्दी रिपोर्ट मा. न्यायालयात सादर करण्याची तजवीज करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ/1264 भानवसे हे करीत असून, दाखल प्रक्रिया पोहेकॉ/138 भोसले यांनी केली आहे.

बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart