वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंटवर मेटल बीम बसविण्याची मागणी.
धोकादायक वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिक व वाहनचालकांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी.
वाटंबरे (प्रतिनिधी):
रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंट हा अपघातप्रवण ठरत असून, या ठिकाणी तातडीने मेटल बीम (क्रॅश बॅरिअर) बसविण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
या कट पॉईंटवरून अकोला, वासूद, कडलास तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, कट पॉईंटच्या उत्तरेकडील बाजूस तीव्र वळण आणि उतार असल्याने या मार्गावरील वाहनांचा वेग अधिक असतो. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांमुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी यापूर्वी अनेक गंभीर अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिक व वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता या कट पॉईंटवर तातडीने मेटल बीम (क्रॅश बॅरिअर) बसवून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
फोटो: वाटंबरे येथील अपघातप्रवण कट पॉईंट , उत्तरेकडून तीव्र गतीने येताना चार चाकी वाहन दिसत आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा