Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

बाबर घराण्याच्या शौर्यगाथेचा इतिहास जोपासला पाहिजे : सुनीलबापू लाड डोंगरगाव येथे पानिपत शौर्यदिन संपन्न

 बाबर घराण्याच्या शौर्यगाथेचा इतिहास जोपासला पाहिजे : सुनीलबापू लाड 


डोंगरगाव येथे पानिपत शौर्यदिन संपन्न



सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


आपल्या कुळाचा अभिमान आपल्याला असायला हवा. सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील बाबर घराण्याचा पानिपतच्या युद्धातील नेत्रदीपक शौर्याचा इतिहास आपण पुढच्या पिढीला दिला पाहिजे. इतिहास कायम जागृत ठेवणे आपले कर्तव्य आहे. पानिपतच्या युद्धात शौर्य व वीरगती प्राप्त झालेल्या महिपतराव बाबर, लिंबाजी बाबर यांच्यासह या परिसरातील ८० वीरगती प्राप्त झालेल्या शूर योद्धांचा इतिहास आजरामर ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. डोंगरगाव येथील बाबरांचा इतिहास अजरामर ठरला. आपणही बाबरांच्या इतिहासाची शौर्यगाथा अभ्यासली पाहिजे. महाराष्ट्राचा पराक्रम जगाला समजला पाहिजे. जीवनात आपल्या आयुष्याचे सोनं व्हावं असं जगलं पाहिजे. इतिहासातील मराठ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श जगापुढे आहे असे विचार महाराष्ट्रातील नामवंत वक्ते सुनीलबापू लाड यांनी डोंगरगाव येथे पानिपत युद्धातील वीरमरण आलेल्या माहिपती बाबर व लिंबाजी बाबर यांच्या ऐतिहासिक कार्याच्या शौर्यगाथा दिनानिमित्त व्यक्त केले.



सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथे बुधवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत पानिपत शौर्यदिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भजन, समाधीस्थळावर पुष्पृष्टी, व ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन केले होते. पानिपतच्या रणभूमीवर वीर सरदार महिपतीराव बाबर, लिंबाजी बाबर व त्यांच्यासोबत ८० शूर मराठा सैनिक वीरगतीस प्राप्त झाले. 

पानिपत शौर्यदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते जगदीश बाबर व डोंगरगाव ग्रामपंचायत , विविध मान्यवरांकडून आयोजित केलेल्या समाधीदर्शन व पुष्पवृष्टी कार्यक्रम प्रसंगी सुनीलबापू लाड हे प्रमुखवक्ते म्हणून बोलत होते. तालुक्यातील विशेषतः मानेगाव, सोनंद, आलेगाव, चोपडी, डोंगरगाव, आरेवाडी, कर्नाटक आदी ठिकाणाहून आलेल्या बाबर घराण्यातील वंशाजाकडून आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण करण्यासाठी व समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी डोंगरगाव गावातील बाबर कुटुंबातील व तालुक्यातील नागरिक, युवावर्ग, इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.



यावेळी सिद्धगोंडा पाटील म्हणाले १७६० मध्ये बाबर घराण्यांनी महाराष्ट्रातील परकीय आक्रमणे थांबवली. मरावे परी कीर्तीरुपी उरावे या ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीसाठी डोंगरगाव येथील महिपतराव बाबर लिंबाजी बाबर व अन्य योद्धांना वीरमरण आले. त्या मराठ्यांचा इतिहास आज आपण तेवत ठेवला पाहिजे. हा इतिहास जगापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करूया. डोंगरगाव येथे या वीर सरदारांचे भव्य स्मारक व ऐतिहासिक स्थळ निर्मितीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे. 

यावेळी चालुक्य अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजीराव चालुक्य-साळुंखे म्हणाले, महाराष्ट्रातील मराठ्यांच्या इतिहासात पानिपत युद्धाला विशेष महत्त्व आहे. चालुक्य घराण्याचे आपण वंशज आहोत. चालुक्याच्या इतिहासाशिवाय इतिहास पूर्ण होत नाही.यापुढील काळात आपणास स्वराज्य रथयात्रेद्वारे देशाचे नेतृत्व करावे लागेल असे विचार व्यक्त केले. 

यावेळी सुतार सर म्हणाले १७६१ मध्ये पानिपतची लढाई झाली .डोंगरगाव येथे या लढाईत विरगती प्राप्त झालेले सरदार महिपतराव बाबर व लिंबाजी बाबर यांचे समाधीस्थळ आहे. हे समाधीस्थळ ऐतिहासिक स्थळ म्हणून शासनाने घोषित करावे. यावेळी जगदीश बाबर यांनी प्रस्ताविक केले तर आभार विशालदीप बाबर यांनी मानले. 

या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग उपायुक्त प्रमोद बाबर, जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्था सांगोला उपाध्यक्ष सुभेदार मेजर रविकांत मराळ, सचिव सुभेदार मेजर बाळासाहेब कोकरे, तसेच या कार्यक्रमासाठी आजी माजी सैनिकांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सोनंद, राजापूर, मानेगाव, जुजारपूर, वासूद ,चोपडी येथील आजी माजी सैनिकांच्या संघटनेतील प्रमुख उपस्थित होते. तसेच सिद्धगोंडा पाटील,सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर, उद्योगपती सतीश पाटील, चेअरमन दगडू बाबर, दिगंबर साळुंखे, कोळगिरीचे सरपंच, विशालदीप बाबर, सुभाष बाबर माणिकराव बाबर, गजाननकाका बाबर, युवराजकाका बाबर ,राजकुमार बाबर, शरद बाबर ,महेश बाबर ,केशव बाबर, सयाजी बाबर, विठ्ठल बाबर, विजय बाबर, दिपक बाबर ,संकेत बाबर ,शंभूराजे बाबर ,श्री बाबर ,जय बाबर, प्रताप बाबर,आलेगावचे सुभाष बाबर,रणजीत बाबर,योगेश बाबर,शाम पवार, सरपंच तानाजी बाबर ,विजय भिंगे यांच्यासह विविध गावातील बाबर घराण्यातील वंशज व विविध संस्थांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व इतिहासप्रेमी, नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.


चौकट: 


१४ जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील पानिपत शौर्यदिन म्हणून घोषित होत आहे. महाराष्ट्रासह, कर्नाटक येथून बाबर घराण्यातील वंशज कार्यक्रमात सहभागी झाले होते. ऐतिहासिक महापुरुषांच्या कार्याचे स्मरण व्हावे व इतिहास जपला जावा. पानिपत युद्धात डोंगरगावचे योद्धे साठ हजारांचे कर्ज काढून पानिपत युद्धात लढले. त्यांना वीरमरण आले. गणपतराव बाबर अफाट पराक्रम करून देशासाठी शहीद झाले. पुढे गोविंदराव बाबर यांनी खूप मोठा पराक्रम केला. ऐतिहासिक दृष्ट्या डोंगरगावला विशेष असे महत्त्व आहे. लोटेवाडी व डोंगरगाव येथील म्हसोबा मंदिर ऐतिहासिक ठेवा आहेत.

: सामाजिक कार्यकर्ते जगदीश बाबर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart