Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या (उजनी उपसा सिंचन योजना) कामाचे 14 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन- शहाजीबापू पाटील

 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या (उजनी उपसा सिंचन योजना) कामाचे 14 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन- शहाजीबापू पाटील.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते 300 कोटींच्या कामाचा शुभारंभ



सांगोला (वार्ताहर) -  

सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सुमारे 22 गावांसाठी वरदायिनी असणारी व गेली 25 वर्षे मंजुरीच्या प्रतिक्षेत असणारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना म्हणजे पूर्वीची उजनी उपसा सिंचन योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी चिकमहूद येथे होणार असल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली भूमिपूजनाच्या कार्यक्रमासोबत कार्यक्रम स्थळी शेतकरी मेळावा आयोजित केल्याची माहिती माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.


सन 2000 साली  78.59 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली होती परंतु पुढील पाच वर्षे या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्याने 2005 साली प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली होती सन 2019 साली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केला त्यांनी या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण शासनाकडून मंजूर करून घेतले व नव्याने 10 गावांचा या योजनेमध्ये समावेश करून एकूण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 22 गावांना या योजनेच्या दोन टीएमसी पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून 27 फेब्रुवारी 2024 रोजी 883.74 कोटी रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यास आमदार शहाजी बापू पाटील यांनी यश मिळवले.

 एकूण 884 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश देण्यात आले होते परंतु निवडणूक आचारसंहिता व मंत्रिमंडळ निवड यामुळे या कामाचे भूमिपूजन लांबले होते.

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्याची विनंती मुंबई येथे केली होती यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी या योजनेचा भूमिपूजन व शुभारंभ कार्यक्रमाला वेळ दिली असून हेलिकॉप्टरने महूद येथे येणार असल्याचे शहाजीबापू यांना कळविले आहे.

या योजनेचे काम सुरू होणार असल्याने 22 गावांमधील सुमारे 13055 हेक्टर शेतजमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार असून पुढील टप्प्यातील उर्वरित कामानाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart